अनेक सूक्ष्म, लघू, आणि मध्यम उद्योगांना (एस.एम.ई) त्यांच्या दीर्घकालीन विकासाला आधार देण्यासाठी निधी का मिळत नाही? विकासाच्या मार्गावर असताना या उद्योजकांना सर्वाधिक भेडसावणारी समस्या कोणती? उद्योजकांनी केलेले अनेक नवनवीन बदल अपयशी का ठरतात? अनेक जण या प्रश्नांची उत्तरे शोधत आहेत. या प्रश्नांची उत्तरे रोहित अरोरा यांनी शोधली असून, यासाठी खास ‘ट्रान्सगनायझेशन’ ही संकल्पना मांडली आहे. आताच्या व्यवसायाभिमुख वातावरणात एखाद्या संस्थेला बदलण्यासाठी तयार केलेली ही मार्गदर्शक सफरच आहे.
आयआयटी मुंबई, आयएसबी हैदराबाद आणि केलॉग स्कूल ऑफ मॅनेजमेन्टचे माजी विद्यार्थी आणि उद्योगक्षेत्रातील १३ वर्षांचा अनुभव गाठीशी असलेल्या अरोरा यांनी ही संकल्पना समजावून देताना सांगितले की, ‘ट्रान्सगनायझेशन ही उद्योगसंस्थेच्या मुळापासून एक बदलाची प्रक्रिया आहे. बाजारातील परिस्थिती बदलत असते किंवा व्यवसाय करण्याच्या पद्धती बदलत असतात किंवा या राज्यातून त्या राज्यात स्थलांतरीत होताना बदल करावा लागत असतो, अशा वेळी होणारी ही प्रक्रिया आहे.
उद्योगांचे सध्याचे वातावरण संभ्रमावस्थेसारखे असल्याचे सांगत अरोरा म्हणाले की, ‘ट्रान्सगनायझेशन ही एक प्रक्रिया आहे. यात बदलणाऱ्या लोकांना, प्रक्रियांना, प्रणालींना, उद्योजकांना, संस्कृतीला आणि विकासाचा स्पर्धात्मक फायदा घेऊन अस्तित्व टिकवण्याची धडपड करणाऱ्या घटकांना एकत्रित आणले जाते. मानवासारखेच कंपन्यांना जन्म, वृद्धापकाळ आणि नंतर मृत्यू या टप्प्यांतून जावे लागते. जीवनातील प्रत्येक टप्प्यात कंपनीचे योग्य प्रकारे व्यवस्थापन होणे गरजेचे असते. अन्यथा त्यांना आजार जडतो व अकाली मृत्यू अटळ ठरतो.