देशातील बँकांची बुडित कर्जे वाढली असली तरी ती चिंताजनक टप्प्यापर्यंत अद्याप पोहोचलेली नाहीत, असा निर्वाळा रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी गुरुवारी गोव्यात बोलताना दिला. कोटय़वधी रुपयांच्या अनुत्पादक मालमत्तेच्या वसुलीबाबत बँकांबरोबर चर्चा करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.
वितरित कर्जाच्या तुलनेत थकीत/बुडित कर्जाचे प्रमाण हे गेल्या तीन वर्षांमध्ये दुप्पट झाले असून पायाभूत सेवा क्षेत्रातील मंदीमुळे प्रामुख्याने ते घडल्याचे मानले जात आहे. सध्या जाहीर होत असलेल्या बँकांच्या तिमाही निकालांतूनही ही स्थिती बदलली नसल्याचे स्पष्ट होत आहे. बँकांची वाढती बुडित कर्जे ही चिंतेची बाब असली तरी त्यामुळे आर्थिक संकट येईल असे नाही, असेही राजन यांनी स्पष्ट केले आहे.
गव्हर्नर म्हणाले की, अनेक बँकांनी त्यांच्या बुडित कर्जाची रक्कम मोठय़ा प्रमाणात खाली आणली आहे. तर काही मात्र वाढत्या बुडित कर्जाचा सामना अद्यापही करत आहेत.
रिझव्‍‌र्ह बँकेची आयटी विंग
आर्थिक व्यवहारांत बोकाळलेल्या सायबर गुन्ह्य़ांचा सामना करण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँक माहिती तंत्रज्ञान विभाग सुरू करणार असल्याची माहिती गव्हर्नर राजन यांनी दिली. सायबर विश्वात गेल्या काही महिन्यांपासून वाढणारे आर्थिक गुन्हे हे चिंताजनक असून त्यावरील नियंत्रणासारखा मुद्दा  चर्चेला येत आहे. रिझव्‍‌र्ह बँकेतील यासाठीची नवी यंत्रणा ही अशी प्रकरणे हाताळण्यासाठी धोरणे आखेल तसेच माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पायबंदासाठी प्रयत्न करेल.