औरंगाबाद शहरातील वेदांत नगर भागात २ आणि सातारा व जवाहरनगर परिसरात दोन घरफोड्या करुन १० लाख १९ हजारांचे सोने लंपास करणाऱ्या सराईत चोरट्यांना औरंगाबाद पोलिसांनी अटक केली आहे. चोरटे हे मूळचे हरयाणातील असून त्यांना गुजरातमधून अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे चोरटे चोरी करण्यासाठी कारमधून जायचे. त्यामुळे कोणालाही त्यांच्यावर संशय यायचा नाही.

औरंगाबाद पोलिसांच्या गुन्हे शाखेने अहमदाबादमधून चोरट्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ३४.५तोळे सोने जप्त करण्यात आले आहे. सतपालसिंग ओमपालसिंग चौहान (३८), परमिंदरसिंग रमेशसिंग तंवर (२५), सोमवीरसिंग मूलसिंग तंवर अशी या चोरट्यांची नावे आहेत. ही टोळी कार घेऊन घरफोड्या करुन ताबडतोब आपल्या राज्यात परतत होती. राजस्थान, आंध्रप्रदेश, तेलंगण या राज्यातही त्यांनी अशाच पद्धतीने घरफोड्या केल्या होत्या. पोलीस निरीक्षक मधूकर सावंत यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.