शहरातील स्मशानभूमीची अवस्था मरणासन्न आहे, जिथे कचरा टाकला जातो तेथे आग लागली तर त्या परिसरात अग्निशामक दलच नाही. शहरात भाजीपाला आणि फळविक्रेत्यांसाठीही विक्री केंद्राची सोय महापालिकेने उपलब्ध करून द्यावी, यासारख्या अनेक त्रुटींवर विकास आराखडय़ात बोट ठेवण्यात आले आहे. आराखडय़ातील निरीक्षणे आणि शिफारशींमध्ये क्रीडा मैदाने व उद्यानांची आवश्यकता नमूद करण्यात आली आहे.
शहरातील बहुतांश लोकसंख्या दाटीवाटीने राहते. दक्षिण-पश्चिम भागात विकास होत असला तरी या भागात क्रीडांगणे आणि उद्यानांसाठी पुरेशा जागा नाहीत. प्राथमिक शाळांच्या जागाही बहुतेक ठिकाणी चुकलेल्या आहेत, अशी निरीक्षणे विकास आराखडा तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांनी नोंदविली आहेत. महापालिकेच्या मोकळय़ा जागा विविध भागात विखुरल्या असल्याने उद्यानांसाठी तसेच नागरिकांना हवेसे वाटेल, वातावरणास उपलब्ध होऊ शकलेले नाही, ते निर्माण करून देणे प्राधान्याचे असेल, असे नमूद करण्यात आलेले आहे. महापालिकेच्या शाळांमधील क्रीडा मैदानेही अपुरी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. खासगी शाळांमध्ये मात्र सुविधा अधिक प्रमाणात आहेत. भाजी मार्केटसाठी योग्य जागा शोधणे आवश्यक असल्याचेही नमूद करण्यात आलेले आहे.