उत्पादक राज्य म्हणून वस्तू आणि सेवा कराचा सर्वात मोठा फटका महाराष्ट्राला बसणार आहे. त्यामुळे राज्यात किती महसुलावर पाणी सोडावे लागेल आणि त्या बदल्यात किती नुकसानभरपाई केंद्र देईल याचे गणित अद्याप मांडले जाणे आहे; परंतु हे आव्हान पेलण्याआधीच आहे त्या परिस्थितीचे ओझे किती जड झाले आहे. याचे चित्र राज्याचा अर्थसंकल्प दाखवून देतो. अशा वेळी महाराष्ट्राचा अर्थमंत्री अन्य अनेक राज्यांच्या अर्थमंत्र्यांप्रमाणे ‘मी तो केवळ हमाल भारवाही..’ इतकाच काय तो उरला. असे परखड मत ‘मी तो केवळ भारवाही..’ या अग्रलेखामध्ये मांडण्यात आले आहे. विविध योजनांच्या माध्यमांतून महाराष्ट्र सरकारास केंद्राकडून जवळपास २५ हजार कोटी रुपयांचे अनुदान मिळणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात ते ३२ हजार कोटी रुपये मिळाले. त्याने बरीच अब्रू वाचली.. मात्र राजकीय यशाने निश्चिलनीकरणाचे पाप झाकले जाते वा गेले ही समजूत कितीही प्रमाणात दृढ झाली असली तरी आर्थिक वास्तवाचा कोंबडा आरवणे काही थांबवता येणार नाही. राज्याच्या अर्थसंकल्पामुळे हेच वास्तव समोर आले आहे. असे मत या अग्रलेखात मांडण्यात आले आहे. याच अग्रलेखावर विद्यार्थ्यांना ब्लॉग लिहायचा आहे. पुढच्या गुरुवापर्यंत विद्यार्थ्यांना मत नोंदविता येईल. हे लेख ब्लॉग बेंचर्सच्या या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना वाचता येतील. या स्पर्धेमध्ये प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी जाहीर केल्या जाणाऱ्या लेखावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते. त्यासाठी पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची वेळ देण्यात आली आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना indianexpress-loksatta.go-vip.net/blogbenchers या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे.