सराईत कर्जबुडव्यांचा आम्ही समाचार घेऊ अशा वल्गना मोदी आणि कंपनीने अनेकदा केल्या आणि अशी कर्जबुडवेगिरी फौजदारी गुन्हा ठरवण्याचा दावा केला. परंतु या नव्या सुधारणांत या सराईत कर्जबुडव्यांविरोधात एक चकार शब्दही नाही. तीच बाब रिझव्र्ह बँकेला दिलेल्या कथित अधिकारांची आहे, असे स्पष्ट मत सोमवारी प्रसिद्ध झालेल्या ‘बँकबुडी अटळच’ या अग्रलेखात मांडण्यात आले आहे. या अग्रलेखावर आपली भूमिका मांडत मुंबईतील ‘रुईया महाविद्यालया’चा विद्यार्थी विनायक आरोटे हा ‘ब्लॉग बेंचर्स’च्या पहिल्या पारितोषिकाचा मानकरी ठरला आहे. या स्पर्धेत औरंगाबादच्या ‘शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालया’चा विद्यार्थी माणिकलाल जैस्वाल याने दुसरे पारितोषिक पटकावले. अग्रलेखावर मत मांडणारे विनायक आणि माणिकलाल यांनी दर्जेदार लेखन करत ‘ब्लॉग बेंचर्स’ स्पर्धेत बाजी मारली. विनायकला सात हजार आणि प्रमाणपत्र तर माणिकलालला पाच हजार रुपये आणि प्रमाणपत्र असे बक्षीस देण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयांच्या प्राचार्याच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात येईल. या अग्रलेखावर व्यक्त होताना राज्यभरातील अनेक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपल्या विचारांना चालना देत उत्तम लेखन केले. महाविद्यालयीन युवाशक्तीच्या लेखणीला व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या या स्पर्धेला विद्यार्थी भरभरून प्रतिसाद देत आहेत. यात प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली नवीन लेख प्रसिद्ध करण्यात येतो. त्यावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते. त्यांना पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची मुदत दिली जाते. विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या लेखांचे परीक्षण तज्ज्ञ परीक्षकांकडून केले जाते. त्यानंतर पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाची बक्षिसे काढली जातात. पहिल्याच लेखापासून या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. विजेत्या विद्यार्थ्यांचे लेख ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध केले जातात. ‘लोकसत्ता’च्या राज्यभरातील वाचकांना या निमित्ताने तरुणाईचे अंतरंग समजून घेण्याची संधी मिळते. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना indianexpress-loksatta.go-vip.net/Blogbenchers या संकेतस्थळाला भेट देऊन आपली भूमिका मांडायची आहे.