पीटीआय, नवी दिल्ली
सरकारने गेल्या काही वर्षांत पायाभूत सुविधा उभारणीवर भरभक्कम जोर दिल्याने खासगी क्षेत्रातील गुंतवणुकीचे रखडलेले चक्र चालू आर्थिक वर्षाच्या उत्तरार्धात अर्थात पुढील सहामाहीपासून गती पकडेल आणि त्यात प्रामुख्याने हॉटेल आणि पर्यटन क्षेत्रात गुंतवणुकीचा ओघ जास्त राहील, असा अंदाज कोटक महिंद्र बँकेच्या मुख्य अर्थतज्त्र उपासना भारद्वाज यांनी मंगळवारी व्यक्त केला.

आर्थिक विकासाला गती देण्यासाठी सरकारकडून भांडवली खर्चात वाढ सुरू आहे. यामुळे करोना संकटानंतर सरकारला विकासाचा वेग कायम राखता आला आहे. सरकारची भांडवली खर्चाची तरतूद आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये ४.३९ लाख कोटी रुपये होती. ही तरतूद २०२४-२५ मध्ये वाढून ११ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर कोटक महिंद्र बँकेच्या मुख्य अर्थतज्ज्ञ भारद्वाज म्हणाल्या की, खासगी क्षेत्रातील गुंतवणुकीचे पुनरुज्जीवन होण्याच्या टप्प्यावर आपण आहोत. चालू आर्थिक वर्षातील ऑक्टोबर ते मार्च या सहामाहीत खासगी क्षेत्रातील गुंतवणूक वाढणार आहे. सार्वजनिक क्षेत्रातील गुंतवणूक काही प्रमाणात कमी होणार आहे. याचवेळी पुढील दोन तिमाहीत खासगी क्षेत्रातून गुंतवणूक लक्षणीय वाढलेली दिसून येईल.  

हेही वाचा >>> ओएनजीसीच्या ऑफशोअर कर्मचाऱ्यांसाठी साधव शिपिंगची फेरी बोट सेवा

केंद्रीय अर्थसंकल्पात भांडवली खर्चाची तरतुदीची रक्कम वाढली असली तरी खर्चातील वाढीचे प्रमाण टक्क्यांमध्ये प्रत्यक्षात कमी आहे. चालू आर्थिक वर्षात भांडवली खर्चाची तरतूद कमी होऊन ११ टक्क्यांनी घटली आहे. या आधीच्या तीन आर्थिक वर्षांमध्ये ही तरतूद सुमारे ३५ टक्के दराने वाढत आली होती.

हॉटेल आणि पर्यटन क्षेत्र ही तुलनेने मागे पडली आहेत. गेल्या काही वर्षांत ती विस्तारताना दिसून आलेली नाहीत. त्यामुळे या क्षेत्रात आता नवीन गुंतवणूक वाढण्याचा अंदाज आहे.- उपासना भारद्वाज, मुख्य अर्थतज्ज्ञ, कोटक महिंद्र बँक