२०१२ मध्ये लावलेल्या ‘मनीषाज् किचन’ या रोपटय़ाचे हळूहळू वृक्षात रूपांतर होत आहे. त्याची एक शाखा शारजापर्यंत पोहोचली आहे. पदार्थाची मराठी चव वाळवंटाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पसरत आहे. त्यांच्या ‘मनीषाज् ओन मराठी फ्युजन’  पाककृतींनी मराठीच नव्हे तर इतर प्रांतीय, जातीय, धर्मीय आणि देशीयांकडून वाहवा मिळवली आहे. अजमानमध्ये ‘मनीषा बेकरी अँड स्वीट्स’ फॅक्टरी सुरू केली असून महाराष्ट्रीय खाद्यसंस्कृतीला जगात मानाचे स्थान मिळवून देण्याची मनीषा बाळगणाऱ्या मनीषा चितळेंचे मराठी पाऊल असे पुढे पडते आहे..

‘‘मनीषाज् किचनची सुरुवात झाल्यापासून अनेक चांगल्या-वाईट अनुभवांतून जायला लागले. ज्या लोकांमुळे ज्या प्रसंगांना सामोरे जावे लागले, त्या सर्वाची मी मन:पूर्वक आभारी आहे. कारण हीच माणसे आपल्या प्रगतीला कारणीभूत असतात.’’ ‘मनीषाज् किचन’ या दुबईतल्या सुप्रसिद्ध मराठी रेस्टॉरन्टची मालक मनीषा सचिन चितळे सांगत होती. तेव्हा तिच्या स्वरातून स्वत:बद्दलचा ठाम विश्वास तर जाणवत होताच, पण त्याचबरोबर मराठी खाद्यसंस्कृतीला जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहचवण्याची तळमळही जाणवत होती. मी  म्हणाले, ‘‘मनीषा, आज आम्हाला ४० वर्षे झाली दुबईत येऊन, कित्येक र्वष मराठी पदार्थ कुठे मिळायचेच नाहीत. आम्ही नेहमी शोधात असायचो की मराठी घरगुती जेवण कुठे मिळेल म्हणून. मराठी माणसेच कमी होती त्या काळात दुबईत आणि ज्यावेळी दुबईत अस्सल मराठी खाद्यपदार्थ देणारे रेस्टॉरन्ट सुरू झाले तेव्हा केवळ मराठीच नव्हेत तर इतर भाषिक भारतीयही तेवढेच खूश झाले होते. एवढेच नव्हे तर आज मुंबई-पुण्यातसुद्धा आपल्याला जे पदार्थ सहजगत्या मिळत नाहीत ते मराठी पदार्थ या रेस्टॉरन्टमध्ये मिळायला लागले. एवढी वर्षे गुजराथी, पंजाबी, दक्षिण भारतीय पद्धतीचे जेवण सर्वत्र मिळत होते, पण अस्सल मराठी चव कुठेतरी हरवलीच होती. पण मनीषा तुझ्यासारख्या स्त्रियांनी जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर अनेक अडचणींवर मात करत रेस्टॉरन्ट यशस्वी करून दाखवले म्हणूनच हे खचितच कौतुकास्पद आहे.’’

Voting through EVM still delay in counting
नागपूर : ईव्हीएमद्वारे मतदान, तरीही मोजणीला विलंब होणार?
In Nagpur a sister killed her brother after information about an immoral relationship
सख्खी बहीण पक्की वैरीण! प्रियकराला सुपारी देऊन भावाचा खून; अनैतिक संबंधाची कुणकुण लागल्याने…
uran, fishers, financial crisis
मत्स्यसंपदा घटल्याने लाखो मच्छीमारांवर आर्थिक संकट
Royal Enfield Bullet Fire On Road In pune Bullet catches fire due to extreme heat
पुणेकरांनो सावधान! पहिल्यांदा स्फोट, नंतर आग, नवी कोरी बुलेट भररस्त्यात जळून खाक; VIDEO होतोय व्हायरल

त्यावर प्रसन्न हसत, नम्रतेने मनीषा उद्गारली, ‘‘तुमच्यासारख्या थोरामोठय़ांची पाठीवर पडणारी कौतुकाची ही थाप आणखीन नवीन काही करण्याची उमेद मनात निर्माण करते.’’ तिच्या यशाचे रहस्य मला जाणून घ्यायचे होते साहजिकच अगदी प्राथमिक प्रश्न तिला विचारला. ‘‘तुला मराठी रेस्टॉरन्ट सुरू करायची कल्पना कशी सुचली? तुझे स्वप्न होते का बालपणापासूनचे? त्यावर मनीषा पटकन उतरली, ‘‘नाही हो, मी तर कमर्शियल आर्टिस्ट आहे. पण एक सांगते, मला मराठी संस्कृती, मराठी भाषा, मराठी खाद्यपदार्थ यांचा, मी मराठी असण्याचा खूप अभिमान आहे आणि म्हणूनच मी जेव्हा दुबईत आले तेव्हा दुबईचा कायापालट झाला होता, पण तरीही मला काहीतरी कमी असल्याचे जाणवले. ते म्हणजे मराठी उपाहारगृह.’’

‘‘मुंबईतील दादरमधील एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातील मी मुलगी. व्यवसायाने कमíशयल आर्टिस्ट. आपल्या मराठी घरात असते ना तसेच आमच्याकडेपण होते. स्वयंपाक आणि शिक्षण हे सर्वाना आलेच पाहिजे. त्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे स्वयंपाकाचे धडे लहानपणीच आजीकडून, आईकडून गिरवले होते आणि त्याच वेळी हळूहळू आवडही निर्माण झाली. स्वयंपाक करताना नवीन काहीतरी करून बघावे, वेगळी, चविष्ट, खास आपली अशी काही पाककृती तयार करावी असे वाटू लागले. पण तरीसुद्धा रेस्टॉरन्टची वगैरे स्वप्ने कधी बघितली नव्हती. आईसारखी गुरू भेटली आणि त्यावेळी तिच्याकडून इतर संस्कारांप्रमाणे स्वयंपाकाचे जे संस्कार झाले त्याचे महत्त्व मला आज कळत आहे. लग्नानंतर, २००० मध्ये मी जेव्हा दुबईला आले, तेव्हा दोन मुलांकडे लक्ष देणे गरजेचे होते. नोकरीचा विचारसुद्धा कधी केला नव्हता. कारण माझ्या नवऱ्याची, सचिनची जाहिरात कंपनीत नोकरी होती. दररोज दुबई-अबुधाबी अपडाऊन करायचा तो, त्यामुळे मी घराबाहेर पडणं शक्यच नव्हतं, पण तरीसुद्धा संसाराची सुरुवात होती, मुले लहान होती, पैशाची गरजही होती तसेच फावल्या वेळात काहीतरी उद्योग करून संसाराला हातभार लावावा ही इच्छा होती. शेवटी आईने शिकवलेला स्वयंपाक कामी आला. आमच्या छोटय़ाशा घरातच मी केटिरग सुरू करायचा निर्णय घेतला. आता जेव्हा कधी भूतकाळात डोकावून बघते तेव्हा आठवतं, आई नेहमी सांगायची, ‘स्वयंपाक करणे हीसुद्धा मोठी कला आहे. मनापासून जर तुम्ही पदार्थ बनवला तर त्याची चव उतरतेच त्यात.’ आईने शिकवलेल्या छोटय़ा छोटय़ा गोष्टीसुद्धा आज मला उपयोगी पडत आहेत.. आणि आजी तर प्रेरणाच ठरली हे सुरू करण्यासाठी.’’ मनीषा भूतकाळात रमली होती.

‘‘मी मनाशी ठरवले, ठाम निश्चय केला आणि केटिरग सुरू केले. सुरुवातीला ३०/४० जणांसाठीच पण वर्षभरातच संख्या ७०/८० वर जाऊन पोहोचली. माझ्या हाताची चव आवडत होती आणि त्यामुळे मागणी वाढू लागली. घर अगदी छोटे होते, मुले लहान होती, सचिनची अबुधाबीची नोकरी होती, घरात धडपणे स्वयंपाकाची भांडी पण नव्हती, सर्व बाजारहाट करा, मदतीला दुसरे कोणी नव्हते, पण जिद्द होती. आत्मविश्वास होता आणि नवऱ्याचा पाठिंबा होता. या भांडवलावर अनुभव नसतानासुद्धा उडी घेतली आणि मोठय़ा जिद्दीने वाटचाल सुरू केली.’’

‘‘आता मागे वळून बघताना वाटते की कसे काय जमले सर्व! २००२-२००४ मध्ये प्रथमच दिवाळीच्या फराळाचे पदार्थ करायचे ठरवले आणि २५०/३०० किलोचे पदार्थ बनवले. यातूनच मला आत्मविश्वास मिळाला. त्याच वेळी म्हणजे २००४ मध्ये महाराष्ट्र मंडळाच्या सत्यनारायणाच्या पूजेच्या प्रसादाच्या ऑर्डरने माझ्या व्यवसायाची घोडदौड सुरू झाली. कारण त्यामुळे लोक ‘मनीषाज् किचन’ला ओळखायला लागले. त्यावेळी मंडळाचे अध्यक्ष अग्निहोत्री होते, त्यांच्या समितीने जे सहकार्य केले त्याचा इथे आवर्जून उल्लेख करावासा वाटतो.’’

‘‘मुले मोठी होत होती. केटिरगच्या व्यवसायात जम बसत होता, मागणी वाढत होती, लोकांचा प्रतिसाद चांगला मिळत होता आणि साहजिकच मराठी उपाहारगृह सुरू करण्याचा विचार येऊ लागला. आतापर्यंतच्या प्रवासात अनेक

खाचखळगे आले होते, उपाहारगृहाची पाऊलवाट सोपी नाही हे पण समजत होते, पण तरीही मन स्वस्थ नव्हते. काहीतरी करून दाखवायची जिद्द मनात होती. दुबईत पंजाबी, दाक्षिणात्य, गुजराथी सर्व प्रकारचे पदार्थ मिळत होते, नव्हते ते मराठीच. पैशाबरोबरच, आपल्या महाराष्ट्राच्या प्रेमापोटी म्हणा, मराठी खाद्यसंस्कृतीचा अभिमान म्हणून म्हणा,  परदेशात या पदार्थाची चव पोहोचावी म्हणून म्हणा, पण मनाशी निर्धार केला आणि माझे मराठी पाऊल पुढे पडले. आज दुबईच्या जीवनातील सर्व क्षेत्रांत मराठी माणसाने आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे, मग मराठी उपाहारगृहे तरी कशी मागे असतील?’’

मनीषा उत्साहाने सांगत होती. ‘‘दुबई म्हणजे वाळवंटातील नंदनवन! आखाती देशात तेलाचा शोध लागला आणि दुबईने घेतलेल्या उत्तुंग भरारीने जगाचे लक्ष वेधले. नोकरीच्या संधी शोधण्यासाठी, व्यवसाय करण्यासाठी, आपल्या स्वप्नपूर्तीसाठी, जगाच्या कानाकोपऱ्यांतून लोकांचा ओघ दुबईकडे वाहू लागला. अत्याधुनिक सुखसोयींनी नटलेले हे शहर खाद्यपदार्थाच्या बाबतीत तरी कसे मागे असेल? इथे जगाच्या कानाकोपऱ्यांतून वेगवेगळ्या देशांची, धर्माची, जातींची माणसे आली आणि येताना त्यांनी आपल्या पाककृतीसुद्धा बरोबर आणल्या.

अरबी खाद्यपदार्थाबरोबर इराणी, मोरक्कन, लेबनीज, काँटिनेंटल, इटालियन, चायनीज-थाय, इंडियन सर्व पदार्थ मिळायला लागले होते.  या खाद्यसंस्कृतीमध्ये, आतापर्यंत दुबईत नसलेले आपले महाराष्ट्रीय पदार्थ आणले, ते काही मराठी रेस्टॉरन्टनी आणि त्यातील एक रेस्टॉरन्ट म्हणजेच माझे ‘मनीषाज् किचन!’’

‘‘मराठी रेस्टॉरन्टच्या माझ्या कल्पनेला साथ दिली माझ्या नवऱ्याने सचिनने. माझ्या व्यवसायाच्या प्रत्येक पायरीवर त्याची साथ मोलाची ठरली. त्याच्या पाठिंब्याशिवाय ‘मनीषाज्..’ उभे राहू शकले नसते. सर्वात मोठा प्रश्न होता भांडवलाचा. त्याने अनेक गुंतवणूकदारांबरोबर बोलणी सुरू केली. पण सर्वाकडून नकारघंटा वाजत होती. मुलेबाळे असलेली एक स्त्री उपाहारगृह चालवणार ही कल्पना त्यांच्या पचनी पडत नव्हती, पण आज मी अभिमानाने सांगू शकते की दुबईत जी मराठी रेस्टॉरन्ट आहेत त्याच्यापाठी स्त्री शक्तीच उभी आहे. शेवटी आम्ही स्वत:चे भांडवल उभे करायचे ठरवले. बरीच जमवाजमव केली आणि जागा बघायला सुरुवात केली. दुबईतल्या बरदुबई आणि करामा या परिसरात जागा शोधत होतो. आमच्याकडे भांडवलही फार नव्हते त्यामुळे जागा मिळणे कठीणच होते, पण आम्ही हार मानली नाही, प्रयत्न चालूच ठेवले आणि सात-आठ महिन्यांच्या अथक प्रयत्नांनंतर शेख हमदान कॉलनीत एक जुने रेस्टॉरन्ट विकायला आहे असे कळले. मालकाला भेटलो, जागा थोडी मोठी होती. त्यामुळे बजेटच्या बाहेर होती, पण आपण जर काही चांगले केले असेल तर देव कोणत्या तरी स्वरूपात भेटतो या म्हणण्याचा आम्हाला प्रत्यय आला. रेस्टॉरन्टचे मालक सुरेश यांनी आर्थिक अडचण जाणून घेतली आणि आमच्या सोयीनुसार सवडीने पैसे देण्याची मुभा दिली. आता मागे वळून बघायचे नाही, मिळालेल्या संधीचा फायदा करून घ्यायचा असे ठरवले. त्यासाठी पुण्याचा फ्लॅट विकायचा ठरवले. गाठीशी जमवलेले पैसे घातले. या आमच्या अडचणीच्या काळात आम्हाला सर्वार्थाने साथ दिली मित्र मंदार दामले, आनंद जोशी आणि रेस्टॉरन्ट क्षेत्राचा गाढा अनुभव असलेले दिगंबर राणे  यांनी. या त्रयींनी दिलेल्या सहकार्याच्या बळावर २०१२ मध्ये ‘मनीषाज् किचन’ची मुहूर्तमेढ रोवली गेली.’’

आयुष्यात आपल्याला ज्यांनी मदत केली त्याची जाणीव ठेवून त्याबद्दल कृतज्ञ असलेल्या मनीषाला मी म्हटले, ‘‘आजच्या काळात आपल्या अडचणीच्या वेळी आपल्या पाठीशी उभे राहणारे मित्र मिळणे हीसुद्धा देवाची मोठी कृपा म्हणायला हवी.’’ त्यावर समाधानी मुद्रेने मनीषा म्हणाली, ‘‘रेस्टॉरन्ट तर सुरू केले, पण त्या क्षेत्रातील अनुभवाची माझी पाटी रिकामी होती. खरे तर खूप मोठे आव्हान होते समोर! पण खरं सांगते मला ते आव्हान कधी वाटलेच नाही. मी ते आव्हान म्हणून नव्हे तर आवड म्हणून स्वीकारले. कारण मनात उमेद होती, विश्वास होता, जिद्द होती. या क्षेत्रातील अनुभवी लोकांच्या मार्गदर्शनाखाली स्वत:च शिकत शिकत मार्गक्रमण करण्याचा निर्णय घेतला. विविध परवाने, मंजुरी, कामगार, कूक, त्यांचे व्हिसा, इंटिरियर, भांडीकुंडी आदी अनेक बारीकसारीक गोष्टी धडपडत शिकत गेले, हे शिकताना अनेक बरे-वाईट अनुभव आले.

इतर सर्व व्यवसायांप्रमाणेच या व्यवसायात कामगारांना सांभाळणे ही तारेवरची कसरत आहे. त्यांच्या बाबतीत दोन्ही अनुभव येतात. एखादा माणूस असा असतो, जिवाला जीव लावून काम करतो, घरचे समजून! हा सर्व रोख रकमेचा उद्योग आहे, त्यामुळे डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागते, विश्वासाची माणसे लागतात. कधी रागावून, कधी प्रेमाने गोड बोलून सर्वाकडून काम करवून घ्यावे लागते. वेळप्रसंगी हातात लाटणे घेऊन स्वत: पण पोळ्या लाटायला बसावे लागते. परदेशात असल्यामुळे नवीन स्टाफ आणताना व्हिसाच्या कटकटींना तोंड द्यावे लागते. पण हळूहळू या गोष्टी शिकत गेले. रेस्टॉरन्टच्या व्यवसायाची अंतर्बाह्य़ माहिती झाली. आणि तेव्हा हेही जाणवले की परदेशात व्यवसाय करणे किती कठीण असते ते!

आज २०१२ साली लावलेल्या रोपटय़ाचे हळूहळू वृक्षात रूपांतर होत आहे आणि त्याची एक शाखा शारजापर्यंत पोहोचली आहे. या दोन्ही शाखा चविष्ट, रुचकर, शुद्ध शाकाहारी जेवणासाठी प्रसिद्ध असून मराठी चव वाळवंटाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पसरत आहे. केवळ महाराष्ट्रीय नव्हे तर इतर प्रांतीय चविष्ट पदार्थ सुद्धा खास मनीषा स्टाइलने बनवले जातात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘मनीषाज् ओन मराठी फ्युजन’  पाककृतींनी मराठीच नव्हे तर इतर प्रांतीय, जातीय, धर्मीय आणि देशीयांकडून वाहवा मिळवली आहे.

आज अजमानमध्ये चायना मॉलच्या जवळ ‘मनीषा बेकरी अँड स्वीट्स’ नावाची फॅक्टरी सुरू केली असून इथे फरसाण, स्वीट्स आणि बेकरीचे पदार्थ बनवायला सुरुवात केली आहे. आत्तापर्यंत ५० प्रकारचे वेगवेगळे पदार्थ तयार केले गेले आहेत.

कोणतेही प्रमुख जाहिरात माध्यम न वापरता, केवळ तोंडी प्रचाराद्वारे त्यांची कीर्ती आखाती देशातच नव्हे तर अनेक देशांत पसरली आहे. परदेशातून येणारे लोक जेव्हा चौकशी करत ‘मनीषाज्’मध्ये येतात तेव्हा अतिशय आनंद होतो. एकतर ‘मनीषाज रेस्टॉरन्ट’ सर्वाना आवडतंय म्हणून आणि दुसरी गोष्ट म्हणजे मराठी खाद्यपदार्थाची चव जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पसरतेय म्हणून!

माझी नजर मनीषाकडे गेली. तिच्या चेहऱ्यावर एक समाधान पसरले होते आणि डोळ्यांमध्ये दिसत होते,उंच भरारी घेण्याचे उद्याचे स्वप्न! अर्थार्जनापेक्षा जास्त, मराठी खाद्यसंस्कृतीला जगात मानाचे स्थान मिळवून देण्याची मनीषा बाळगणाऱ्या मनीषाला भव्यदिव्य यश लाभो, हीच श्रींच्या चरणी प्रार्थना!

manishaskitchen.com
maneshachitale@gmail.com

मेघना वर्तक -meghana.sahitya@gmail.com