केंद्र सरकारची ‘आत्मनिर्भर भारत’ योजना म्हणजे ‘लॉलिपॉप’ आहे. त्यामुळे लोकांनी सरकारच्या दिवास्वप्नाला बळी पडू नये, असे आवाहन करणारे पोस्टर नक्षलवाद्यांनी झारखंडमधील छत्रा जिल्ह्यात लावल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

छत्रा जिल्ह्यातील राजपूर बाजार भागात नक्षलवाद्यांनी शुक्रवारी ही पोस्टर्स लावली होती. याची खबर मिळताच पोस्टर लावलेल्या ठिकाणी पोलीस पोहोचले आणि त्यांनी ती काढून टाकली. ज्या ठिकाणी ही पोस्टर्स लावण्यात आली होती तो राजपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील भाग झारखंड-बिहारच्या सीमेवर येतो. हा भाग नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो.

या भागात यापूर्वी नक्षलवाद्यांनी केलेल्या हिंसाचारात डझनभर नागरिकांना आपले जीव गमवावे लागल्याचे पोलिसांनी सांगितले. गुरुवारी देखील या भागात अशा प्रकारची पोस्टर्स आढळून आली होती. त्यामुळे यावरुन पुन्हा हिंसाचार भडकेल की काय या भीतीने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.