नरेंद्र मोदी सरकारने जम्मू काश्मीरसंबंधी ५ ऑगस्टला ऐतिहासिक निर्णय घेत राज्याला स्वतंत्र दर्जा देणारं वादग्रस्त ३७० कलम हटवण्याचा निर्णय घेतला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सर्वप्रथम ही घोषणा केली. जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर पाकिस्तानचा तिळपापड झाला. एकीकडे भारतासोबतचा व्यापार पाकिस्तानने बंद केला, तर दुसरीकडे समझोता एक्स्प्रेस, भारतीय चित्रपटांवर बंदी असे अनेक निर्णय पाकिस्तानने घेतले. तशातच पाकिस्तानचे केंद्रीय मंत्री फवाद हुसेन यांनी एक ट्विट केले होते. त्या ट्विटला भारताची नेमबाज हिना सिधू हिने सडेतोड उत्तर दिले आहे.

“भारतीय लष्करातील सर्व पंजाबी जवानांनो, काश्मीरमध्ये जो अन्याय आणि अत्याचार सुरू आहे, त्यात सहभागी होऊ नका. त्या भागात सेवेवर जाण्यास तुम्ही नकार द्या”, असे ट्विट फवाद हुसेन यांनी केले होते. त्यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. त्यातच नेमबाज हिना सिधूने त्यांना चांगलेच धारेवर धरले.

“भारताच्या सुरक्षेसाठी पंजाबी लोक कायमच तत्पर राहिले आहेत. मी पंजाबी आहे आणि सिधू आहे. शिख समाजाचा इतिहास तुम्ही वाचला असाल अशी मला अपेक्षा आहे. त्यामुळे लष्कराचा विषय बाजूला राहू दे .. आमची (भारताची) सुरक्षा करण्यासाठी आम्ही लष्करी सेवेतच भरती होण्याची गरज नाही”, असे हिनाने फवाद यांना सुनावले.

दरम्यान, ३७० कलम हटवल्यानंतर भारतातील नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले. इतकेच नव्हे तर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी काश्मीरी जनतेत मिसळून त्यांच्याशी संवाद साधला, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच हा निर्णय कसा योग्य आहे याबाबत त्यांना पटवून दिले.