दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात झालेल्या दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत तीन जवान शुक्रवारी शहीद झाले. 
पुलवामा जिल्ह्यातील त्राल भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती लष्कराला मिळाल्यावर जवानांनी या भागात शोधमोहिम सुरू केली. बुच्छो गावात पोलिस दहशतवाद्यांच्या शोध घेत असताना गावाजवळील जंगलातून जवानांच्या दिशेने गोळीबार करण्यात येऊ लागला. याच गोळीबारात तीन जवान शहीद झाले, अशी माहिती लष्कराच्या प्रवक्त्याने दिली.
या घटनेनंतर त्रालमध्ये लष्कराच्या जवानांची आणखी कुमक पाठविण्यात आली असून, दहशतवाद्यांचा शोध घेण्यात येतो आहे. दरम्यान, दहशतवादी शहीद जवानांकडील शस्त्रास्त्रे घेऊन पळाल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, लष्कराच्या अधिकाऱयांनी याला दुजोरा दिलेला नाही.