भारताच्या दक्षिणेत राहणारी लोक आफ्रिकन लोकांसारखे तर ईशान्य भारतातील लोक चीनी लोकांप्रमाणे दिसतात, असं विधान काँग्रसेचे नेते सॅम पित्रोदा यांनी केलं आहे. या विधानानंतर भाजपाकडून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. पंतप्रधान मोदी यांनी या विधानावरून काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांना लक्ष्य केलं आहे. पित्राोदा यांचे विधान म्हणजे भारतीय जनतेचा अपमान आहे, असं ते म्हणाले. बुधवारी तेलंगणातील प्रचारसभेत बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. काय म्हणाले पंतप्रधान मोदी? “आपल्या त्वचेचा रंग कोणताही असो, आपण भगवान श्रीकृष्णाची पूजा करणारे लोक आहोत. मला पित्रादा यांच्या विधानाचा खूप राग आला आहे. आज जे लोक संविधानाचं रक्षण करण्याच्या गोष्टी करतात, तेच लोक आज त्वचेच्या रंगावरून भारतीय जनतेचा अपमान करत आहेत”, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान मोदी यांनी दिली. हेही वाचा - काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी विलीन होणार का? शरद पवार म्हणाले… “विरोधकांकडून जेव्हा मला शिवीगाळ केली जाते, तेव्हा ती मी सहन करू शकतो. परंतू माझ्या देशातील जनतेला कोणी काही म्हटलं, तर ते मला सहन होत नाही. आज त्वचेच्या रंगावरून आपण एखाद्या व्यक्तीची गुणवत्ता ठरवू शकत नाही” असेही ते म्हणाले. राहुल गांधी यांनाही केलं लक्ष्य पुढे बोलताना त्यांनी पित्रोदा यांच्या विधानावरून राहुल गांधी यांनाही लक्ष्य केलं. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांचा उल्लेख 'युवराज' असा केला. “अशा प्रकारची विधाने करून देशातील जनतेचा असा अपमान करण्याची परवानगी या लोकांना कोणी दिली, याचं उत्तर काँग्रेसच्या युवराजांना द्यावं लागेल. आम्ही ही वर्णद्वेषी मानसिकता कधीही स्विकारणार नाही”, अशी टीका त्यांनी केली. इतर भाजपा नेत्यांकडूनही पित्रोदांच्या विधानाचा निषेध : पंतप्रधान मोदींबरोबर भाजपाच्या इतर नेत्यांनीही सॅम पित्रोदा यांच्या विधानाचा निषेध केला. “सॅम भाई, मी ईशान्य भारतातून येतो. पण मी भारतीय लोकांसारखाच दिसतो. आपला देश विविधतेने नटलेला आहे. कदाचित आपण भिन्न दिसत असून पण आपण सर्व एकच आहोत”, अशी प्रतिक्रिया आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी दिली. तसेच नुकताच भाजपात प्रवेश केलेल्या कंगना रणौतनेही सॅम पित्रोदांच्या विधानावरून टीका केली. “पित्रोदा यांचे विधान वर्णद्वेषी आणि विभाजनवादी आहे. हे महाशय राहुल गांधी यांचे मार्गदर्शक आहेत”, असे कंगनाने म्हटले. हेही वाचा - काँग्रेसमध्ये प्रादेशिक पक्ष विलीन करण्याच्या पवारांच्या विधानावर नाना पटोलेंचं भाष्य; म्हणाले, “अनेक पक्षांचा…” सॅम पित्रोदा नेमकं काय म्हणाले होते? द स्टेट्समनला दिलेल्या मुलाखतीमध्ये भारताच्या लोकशाहीबाबत बोलताना, दक्षिणेतील लोक आफ्रिकन नागरिकांसारखे दिसतात, असं विधान सॅम पित्रोदा यांनी केलं होतं. “मागच्या ७५ वर्षात भारतातील लोक गुण्यागोविंदाने एकत्र नांदत आले आहेत. याकाळात काहीसे मतभेद झाले असतील पण ते तेवढ्यापुरतेच होते. भारतात एका बाजूला ईशान्येकडील लोक चीनी दिसतात, पश्चिमेकडची लोक अरबांसारखी दिसतात, तर उत्तर भारतातील लोक कदाचित गोऱ्या पाश्चात्य लोकांसारखी आणि दक्षिणेतील लोक आफ्रिकन नागरिकांसारखे दिसतात. तरीही त्याचा आपल्या जगण्यावर काहीही परिणाम झालेले नाही. आपण सर्वच बंधू आणि भगिनींप्रमाणे एकत्र नांदत वैविध्यपूर्ण देश एकत्र ठेवू शकलो. आपण सर्वच विविध भाषांचा, विविध धर्मांचा, संस्कृती आणि खाद्य परंपरेचा सन्मान करत आलो आहोत. हा भारत देश आहे, ज्यावर आपल्या सर्वांचा विश्वास आहे”, असे ते म्हणाले होते.