आरुषी हत्या प्रकरणात चार वर्षे तुरुंगात असलेल्या तलवार दाम्पत्य अखेर सुटका झाली आहे. गेल्याच आठवड्यात राजेश आणि नुपूर तलवार यांची अलाहाबाद न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली होती. त्यानंतर आज तलवार दाम्पत्याची उत्तर प्रदेशमधील डासना तुरूंगातून सुटका झाली. २००८ मधील आरुषी-हेमराज हत्याकांड प्रकरणात तलवार दाम्पत्याला सीबीआयच्या न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला त्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

मुलगी आरुषी तलवार आणि नोकर हेमराज यांच्या हत्येच्या आरोपावरुन तलवार दाम्पत्याला २०१३ मध्ये सीबीआयच्या न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली होती. या शिक्षेला तलवार दाम्पत्याने अलाहाबाद उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. १२ ऑक्टोबरला अलाहाबाद उच्च न्यायालयाने तलवार दाम्पत्याची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. यानंतर आज त्यांची तुरुंगातून सुटका झाली. यावेळी राजेश तलवार यांचे भाऊ दिनेश तलवार, त्यांचे वकील मनोज सिसोदिया आणि तनवीर अहमद मीर तुरुंगाबाहेर उपस्थित होते. यावेळी डासना तुरुंगाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात होता.

गाझियाबाद स्थित सीबीआयच्या विशेष न्यायालयाने तलवार दाम्पत्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या निर्णयाला आव्हान देणाऱ्या अपिलावर एक ऑगस्ट २०१७ रोजी पुन्हा एकदा सुनावणी सुरू झाली. न्या. बालकृष्ण नारायण आणि न्या. अरविंद कुमार मिश्र यांच्या खंडपीठाने सीबीआयच्या आरोपपत्रातील विरोधाभासामुळे या प्रकरणाची पुन्हा सुनावणी करणार असल्याचे म्हटले होते. मे २००८ मध्ये नोएडातील जलवायू विहार परिसरात १४ वर्षांच्या आरूषीचा मृतदेह घरात आढळून आला होता. आरूषी आपल्या खोलीत मृत आढळून आली होती. तीक्ष्ण शस्त्राने तिचा गळा चिरण्यात आला होता. सुरूवातीला संशयाची सुई हेमराजकडे गेली होती. पण दोन दिवसानंतर घराच्या गच्चीवर त्याचाही मृतदेह आढळला होता. देशभरातील माध्यमांमध्ये चर्चिल्या गेलेल्या या प्रकरणामुळे उत्तर प्रदेश पोलिसांवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री मायावती यांनी हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले होते. या प्रकरणाचा तपासही सीबीआयच्या दोन पथकांनी केले होते.