मणिपूरमधील हिंसाचाराच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अविश्वास ठराव आणण्यात आला आहे. अविश्वास ठरावावर बोलताना विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं आहे. अशात मंगळवारी ( ८ ऑगस्ट ) राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर टीका केली होती. केंद्र सरकारने ९ वर्षात ९ सरकारे पाडली, असा हल्लाबोल सुप्रिया सुळे यांनी केला होता. याला गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी प्रत्युत्तर दिलं आहे. सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? "केंद्र सरकार सत्तेतील ९ वर्षाचा कार्यकाळ साजरा करत आहे. आपली कामगिरी दाखवण्यासाठी केंद्र सरकारकडून देशात ( नवरत्न नौ साल ) अभियानही राबवण्यात येत आहे. पण, गेल्या ९ वर्षांत या सरकारने काय केलं ते पाहा. अनेक राज्यांमधील सरकारे भाजपाने पाडली. गेल्या ९ वर्षांत ९ राज्य सरकारे भाजपाने पाडली. ही लोकशाही आहे का?" असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला होता. हेही वाचा : “मोदींनी मला पहाटे ४ ला फोन केला आणि..”, मणिपूर हिंसाचाराच्या चर्चेत अमित शहांचा विरोधकांवर पलटवार, म्हणाले, “फक्त..” अमित शाह काय म्हणाले? बुधवारी अविश्वास प्रस्तावावर बोलताना अमित शाहा यांनी सुप्रिया सुळेंना जशास तसे प्रत्युत्तर दिलं. "सुप्रिया सुळे म्हणाल्या आम्ही सरकारे पाडली. महाराष्ट्रात सर्वात पहिल्यांदा शरद पवारांनी वसंतदादा पाटील यांचं सरकार पाडलं. नंतर भारतीय जनसंघाचा पाठिंबा घेऊन शरद पवार मुख्यमंत्री बनले," असं अमित शाहांनी सांगितलं. यावेळी सुप्रिया सुळे यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला. तेव्हा अमित शाह खाली बसले. सुप्रिया सुळेंनी म्हटलं, "त्यावेळी एस.एम. जोशी हे निमंत्रक होते." यावर अमित शाह म्हणाले, "निमंत्रक एस.एस जोशी होते, तर मुख्यमंत्री कोण बनले? सत्ता कोणी भोगली? शरद पवारांनीच ना?"