भारतात दोन करोना प्रतिबंधक लसींना मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, अद्यापही काही नागरिकांची मानसिकता तयार झालेली नाही. लस घेण्याबाबतच्या लोकांच्या मानसिकतेबाबत एक ऑनलाइन सर्वेक्षण करण्यात आलं होतं यामधून ही बाब समोर आली आहे. या सर्वेनुसार, ६९ टक्के भारतीय अद्यापही द्विधा मनस्थितीत आहेत, तर २६ टक्के नागरिकांनी ठामपणे आपण लवकरात लवकर लस घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचं म्हटलं आहे.

ऑक्टोबर २०२० पासून ‘लोकलसर्कल्स’ या सर्वेक्षण कंपनीने लसीबाबत भारतीयांचं मत काय आहे. त्यांची लसीबाबत अनिच्छा किंवा संकोच करण्याची टक्केवारी वाढली आहे की कमी झाली आहे किंवा कायम आहे हे समजून घेण्याचा ऑनलाईन सर्वेक्षणाद्वारे प्रयत्न केला.

या सर्वेनुसार, ऑक्टोबरमध्ये लस घेण्याबाबत द्विधा मनस्थिती असलेल्या लोकांचे प्रमाण ६१ टक्के होते. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये यामध्ये वाढ होत याचं प्रमाण ५९ टक्क्यांवर गेलं. त्यानंतर ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेकाची सीरम बनवत असलेल्या लसीमुळे भारताच्या अपेक्षा वाढल्याने लोकांच्या मनस्थितीत बदल होत याची आकडेवरी ६९ टक्क्यांवर पोहोचली.

दरम्यान, डिसेंबरमध्ये लोकलसर्कल्सचे सदस्य डॉ. अब्दुल गफूर यांनी दुसऱ्या एका स्वतंत्रपणे केलेल्या सर्वेक्षणात समोर आलेली बाब म्हणजे. ५५ टक्के हेल्थकेअर प्रोफेशनल्स सुद्धा तात्काळ करोना प्रतिबंधक लस घेण्याबाबत द्विधा मनस्थितीत आहेत. या लोकांमध्ये लसीतून होणाऱ्या साईड इफेक्ट्सबाबत काळजी असून तिच्या प्रभावीपणाबाबत त्यांना खात्री नाही. उलट यांपैकी ६० टक्के हेल्थकेअर प्रोफेशनल्सनी प्रत्यक्ष कोविडच्या रुग्णांची सेवा केली आहे. त्यामुळे त्यांना करोनाच्या संसर्गाची सर्वाधिक भीती असतानाही त्यांच्यामध्ये लस घेण्याबाबत ही द्विधा मनस्थिती आहे.