उमर फयाजच्या मृत्युमुळे जम्मू आणि काश्मीरमध्ये आता लष्कराने दहशतवाद्यांशी लढण्याच्या त्यांच्या स्ट्रॅटेजीमध्ये बदल केला आहे. लष्कराची ‘कॉर्डन अँड सर्च’ ही पध्दत त्यांनी १५ वर्षांपूर्वी बंद केली होती ती पध्दत त्यांनी पुन्हा सुरू केली आहेत. या पध्दतीमध्ये दारोदारी जात घरांची झडती घेत अतिरेक्यांचा शोध घेतला जात असे. पण या पध्दतीचा अतिरेक झाल्याने २००२मधे ही पध्दत थांबवण्यात आली होती.
गेल्या वर्षी दहशतवादी बुरहान वानीच्या खात्म्यानंतर जम्मू- काश्मीरमधली परिस्थिती खूपच स्फोटक होती. दगडफेकीच्या घटना मोठ्या प्रमाणावर होऊ लागल्या. तेव्हापासून आजवर परिस्थिती पू्र्णपणे नियंत्रणात आलेली नाही. त्यामुळे ‘कॉर्डन अँड सर्च’ ही पध्दत लष्कराने पुन्हा अवलंबायला सुरूवात केली आहे. जम्मू आणि काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यामध्ये हैफ आणि शिरमाल या गावांमध्ये लष्कराने मंगळवारी रात्री ही कारवाई केली. ही कारवाई मंगळवार रात्रभर चालली आणि बुधवारी सकाळी थांबली.

काश्मीरमध्ये भारतविरोधी वातावरण नक्कीच आहे पण त्याला कट्टरवाद्यांकडून खतपाणीही तेवढंच घातलं जातंत. दक्षिण काश्मीर हा दगडफेकीच्या घटनांचा केंद्रबिंदू बनत चालला आहे. तसंच अलीकडे या दगडफेकीत शाळकरी मुलांचाही सहभाग वाढला आहे. ही एक मोठी समस्या झाली आहे. त्याचबरोबर सीमेवर शस्त्रसंधी उल्लंघनाचं प्रमाणही वाढलं आहे. जम्मू आणि काश्मीरच्या शहरांमध्ये दहशतवादी हल्लेही होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर घरोघरी जात दहशतवाद्यांना हुडकून काढणं सैन्याला गरजेचं वाटत असल्याने त्यांनी ‘कॉर्डन अँड सर्च’ ही पध्दत पुन्हा अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे दहशतवादाचा आणि त्या अनुषंगाने अनेक समस्यांचं निराकरण करणं शक्य होई अशी लष्कराची धारणाल आहे.