गेल्या काही दिवसांमध्ये भाजपचे अपयश अधोरेखित करण्याची एकही संधी न सोडणाऱ्या काँग्रेसच्या हाती आणखी एक ‘घबाड’ लागले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे पुत्र जय शहा हे संचालक असलेल्या कंपनीचा डोळे दिपवणारा विकास यासाठी निमित्त ठरलाय. काँग्रेसने रविवारी पत्रकार परिषद घेऊन या कंपनीची चौकशी करण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे केली. काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी केलेल्या आरोपांनुसार जय शहा संचालक असलेल्या टेम्पल एन्टरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने यंदाच्या वर्षी ८०.०५ कोटी रूपयांची आर्थिक उलाढाल केली आहे. टेम्पल एन्टरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेडने स्वत:हूनच ही माहिती कंपनी नोंदणी कार्यालयाला दिली आहे. मात्र, कंपनीच्या गेल्यावर्षीच्या उलाढालीवर नजर टाकल्यास यामध्ये तब्बल १६,००० पटींना वाढ झाली आहे. परंतु, या कंपनीकडे कोणत्याही मालाचा साठा किंवा संपत्ती नसूनही त्यांनी इतका उत्कर्ष कसा साधला, असा सवाल कपिल सिब्बल यांनी उपस्थित केला. हे आश्चर्यकारक नाही का? महत्त्वाची गोष्ट म्हणजे सत्ताबदल झाल्यानंतर हे सर्व घडले आहे. यालाच भांडवलदारांची कंपूशाही म्हणतात. आता पंतप्रधान सीबीआयला या सगळ्याची चौकशी करायला सांगणार आहेत का? जय शहा यांना अटक होईल का? पंतप्रधान शहा यांच्या मुलाची चौकशी करण्याचा प्रामाणिकपणा दाखवणार का?, असेही सिब्बल यांनी विचारले.

तर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी जय शहा हे नोटबंदीच्या निर्णयाचे सर्वात मोठे लाभार्थी असल्याचा आरोप केला आहे. अखेर नोटबंदीमुळे फायदा झालेले लोक आपल्यासमोर आले आहेत. मात्र, यामध्ये रिझर्व्ह बँक, गरीब जनता किंवा शेतकरी यापैकी एकाचाही समावेश नाही. अमित शहा हेच नोटबंदीचे ‘शहा-इन-शहा’ आहेत, अशी शाब्दिक कोटी राहुल यांनी ट्विटरवरून केली आहे.