नवी दिल्ली : प्राप्तिकर विभागाने काँग्रेस पक्षाला १,८२३ कोटी रुपयांचा कर व दंड भरण्यासाठी नोटीस पाठविल्याने शनिवारी देशभरात पक्षाच्या कार्यकत्या र्यानी निदर्शने केली. भाजपवर ‘कर दहशवादी’ असा आरोप करून भाजप सरकारच्या काळात लोकशाही धोक्यात असल्याचा आरोप केला. दिल्लीमध्ये ‘युवा काँग्रेस’चे नेते आणि कार्यकर्त्यांनी निदर्शने करण्यात आली. केंद्र सरकार काँग्रेसला निरनिराळया मार्गानी कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र आमचा पक्ष त्याला घाबरत नसल्याचे ‘युवा काँग्रेस’चे अध्यक्ष श्रीनिवास बी व्ही यांनी स्पष्ट केले. कर नियमांच्या खाली काँग्रेसला त्रास दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. देशभरातील अनेक शहरांतील काँग्रेस कार्यालयांबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप सरकारचा जोरदार निषेध करत ‘लोकशाही वाचवा’ अशी घोषणा दिली. ‘‘लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्ष वरचढ ठरू नये यासाठी भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या सांगण्यावरून काँग्रेसला नोटिसा पाठवल्या जात आहेत. मुक्त व निष्पक्ष निवडणुका होऊ नयेत म्हणून प्राप्तिकर विभाग जाणूनबुजून हे करत आहेत,’’ असा आरोप छत्तीसगडचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष एच. एस. लकी यांनी केला. काँग्रेसचे सरचिटणीस पृथ्वीराज साठे हे गुवाहाटी येथे काँग्रेसच्या आंदोलनात सहभागी झाले. आम्हाला रस्त्यावर आंदोलनाची परवानगी न मिळाल्यामुळे त्यामुळे आम्हाला पक्ष कार्यालयात निदर्शने करावी लागत असल्याचे त्यांनी सांगितले. विरोधकांना रस्त्यावर आंदोलन करू न देऊन भाजप लोकशाहीचा गळा घोटत असल्याचा आरोप साठे यांनी केला. काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत मंचावर ‘धुलाई यंत्र’ नवी दिल्लीत काँग्रेसकडून आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेच्या व्यासपीठावर धुलाई यंत्र दाखवत काँग्रेसने शनिवारी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. हे भाजपचे धुलाई यंत्र असून सत्ताधारी पक्षाशी जुळवून घेणाऱ्या नेत्यांना यामध्ये स्वच्छ करून घेतले जाते, असा टोला काँग्रेसने लगावला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांना २०१७ च्या भ्रष्टाचार प्रकरणात सीबीआयने निर्दोषत्व दिल्याने काँग्रेसने भाजपवर टीका केली. प्राप्तिकर विभागाने काँग्रेसला पाठवलेली नोटीस हा देशभरातील सर्वच राजकीय पक्ष आणि जनतेसाठीही इशारा आहे. राजकीय पक्षांना नष्ट करण्याचा भाजपचा हेतू आहे. भाजपला देशातील एकमेव पक्ष म्हणून राहण्याची आशा आहे. ‘एक देश, एक पक्ष’ हा इशारा प्रत्येकासाठी आहे. - पी. चिदंबरम, काँग्रेस नेते काँग्रेस पक्ष साठ सत्तर वर्षे राबवलेल्या सत्तेमुळे अजूनही अहंकारी आहे. जर इतर पक्ष प्राप्तिकर कायद्यांचे पालन करत असतील तर काँग्रेस का नाही? हा पक्ष कायद्यापेक्षा मोठा नाही. - अनुराग ठाकूर, केंद्रीय मंत्री