नवी दिल्ली : राम मंदिर निर्माणाच्या प्रस्तावावर लोकसभेत शनिवारी बोलताना महाविकास आघाडीतील ठाकरे गट व शरद पवार गटातील खासदारांनी भाजप व मोदी सरकारला वाक्यागणिक कोपरखळय़ा मारल्या! ‘राम वनवासात गेल्यावर भरताने रामाच्या पादुका ठेवून राज्य केले. कोणाच्या पाठीत खंजीर खुपसून राज्य केले नाही. या आदर्शाची तरी आठवण ठेवा, अशी टीका शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार अरिवद सावंत यांनी केली. राम मंदिर निवडणुकीचा मुद्दा कसा? राम मंदिर हा राजकीय वा निवडणुकीचा मुद्दा असू शकत नाही. धार्मिक कट्टरता देशाचे नुकसान करते. उलट, धार्मिक उदारता व वैश्विकता देशाला मानवतेच्या उच्चतम स्थानावर घेऊन जाते, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी राम मंदिराच्या प्रस्तावावरील चर्चेत भाजप व मोदी सरकारला लक्ष्य केले. हेही वाचा >>>लोकसभा निवडणुकीपूर्वी ‘सीएए’ची अंमलबजावणी! मोदींमुळे शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न पूर्ण! राम मंदिर निर्माणाचे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पूर्ण केले असून ते योगीपुरुष आहेत, अशी स्तुतिसुमने शिवसेनेचे (शिंदे गट) खासदार श्रीकांत शिंदे यांनी उधळली. रामाने रावणाचा पराभव केल्यानंतरही लंकेची सत्ता बिभिषणाकडे दिली. किष्किंधाच्या लढाईमध्ये वालीचा पराभव केला पण, तिथेही राज्य स्वत:च्या ताब्यात ठेवले नाही. सत्तेची अभिलाषा बाळगणाऱ्यांनी रामाच्या त्यागाचे महत्त्व लक्षात घेतले पाहिजे. - अरविंद सावंत, खासदार, शिवसेना (ठाकरे गट) एकवचनी रामाचा आदर्श केंद्र सरकारने ठेवला पाहिजे. दोन कोटी रोजगार, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट, २०२२ पर्यंत सगळय़ांना पक्की घरे या वचनांचे काय झाले? - अमोल खोल्हे, खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार काँग्रेसच्या ब्रिटिश मानसिकतेमुळे राम मंदिर उभे राहण्यास दिरंगाई झाली. काँग्रेसने याच मानसिकतेच्या इतिहासकारांना हाताशी धरले होते, त्यांनी इतिहास बदलण्याचा प्रयत्न केला. आता तरी काँग्रेसच्या नेत्यांनी राम मंदिराला भेट देऊन पापक्षालन केले पाहिजे. - डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार, शिवसेना (शिंदे गट)