सोशल मीडियाच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांत अफवांना पेव फुटत चाललं आहे. त्यातून विशिष्ट समूहाच्या भावना भडकावणं, आक्षेपार्ह मजकूर सोशल मीडियावर पोस्ट करून एखाद्याच्या भावना दुखावणं किंवा एखाद्याची बदमानी करणं असे प्रकार जगभरात झपाट्यानं वाढत चालले आहे. असे आक्षेपार्ह मजकूर फेसबूकच्या मार्फत अधिक पसरू नये तसेच या माध्यमाचा कोणीही गैरवापर करू नये यासाठी फेसबुकनं महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. आता फेसबुकरील आक्षेपार्ह मजकूरावर लक्ष ठेवण्यसाठी फेसबुकनं ७ हजारांहून अधिक ‘द्वारपालां’ची नेमणूक केली आहे.

हे ‘द्वारपाल’ चोवीस तास फेसबुकवर येणाऱ्या आक्षेपार्ह मजकूरावर लक्ष ठेवून असणार आहे. जगभरातील विविध भाषांचे ज्ञान असणाऱ्या साडे सात हजार माहिती निरीक्षकांची नियुक्ती फेसबुकनं केली आहे. फेसबुकवर येणारा मजकूर पडताळणं, त्यावर लक्ष ठेवणं आक्षेपार्ह मजकूर असेल तर तो फेसबुकवरून हटवणं हे प्रमुख काम त्यांचं असणार आहे. विशेष म्हणजे धार्मिक भावना दुखवणारे किंवा द्वेष पसरवणारे तसेच बाल अत्याचारांसंबधीत मजकूरावर लक्ष ठेवण्याची प्रमुख जबाबदारी त्यांची असणार आहे.

अॅलन सिल्वर यांनी आपल्या ब्लॉगमधून या संदर्भातली माहिती दिली आहे. फेसबुकच्या या नव्या मोहीमेच्या त्या प्रमुख आहेत. जगभरातील जवळपास ५० हून अधिक प्रमुख भाषांचं ज्ञान असणाऱ्या माहिती निरीक्षकांची नेमणूक फेसबुकनं केली आहे. हे निरीक्षक जगभरातून फेसबुकवर येणाऱ्या पोस्टवर लक्ष ठेवणार आहेत. जर एखादा आक्षेपार्ह मजकूर स्थानिक भाषेत असेल तर त्याचा अर्थ जाणून ते हटवण्याची जबाबदारी काही खासगी कंपन्यांना देण्यात येईल असंही अॅलन म्हणाल्या.