मध्य प्रदेशमधील बालाघाट जिल्ह्यातील गांगुलपारा जलाशयात महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यातील चार तरूणांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी सांयकाळी उघडकीस आली. मृत तरूण हे गोंदियातील ग्राम कटंगी येथील रहिवासी होते. गोलू उर्फ आशिष गिरिराज राठोड (वय २३ वर्षे), दुर्गेश मारूती घोषे (२३), विल्सन विजय मदारी (१९) व दीपक भाऊराव नेवारे (वय २१, रा. सर्व ग्राम कंटगी, गोंदिया) अशी मृत तरूणांची नावे आहेत.

अधिक माहिती अशी, मृत चारही तरूण शनिवारी दुचाकीवरून गोंदियापासून जवळ असलेल्या बालाघाट जिल्ह्यातील गांगुलपारा जलाशयाच्या ठिकाणी गेले होते. ते शनिवारीच परतणार होते. मात्र रविवारी सकाळपर्यंत न आल्याने कुटुंबीयांनी गांगुलपुरा पर्यटनस्थळ गाठले. त्या ठिकाणी त्यांची दुचाकी आढळून आली. पण ही चारही मुले गायब होती. कुटुंबीयांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी शोधाशोध केला असताना तिघांचे मृतदेह धबधब्याजवळील जलाशय परिसरात आढळून आले तर दीपक नेवारेच्या मृतदेहाचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता. जलाशयात पोहताना बुडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पोलीस तपास सुरू आहे.