भारतीय लष्टकरानं तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. जम्मू काश्मिरमधील शोपियां येथे भारतीय लष्कर आणि पाकिस्तानी दहशवाद्यांमध्ये शनिवारी सकाळी चकमक झाली. यामध्ये भारतीय लष्करानं तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

दुसरीकडे शुक्रवारी रात्री पुंछमध्ये तीन भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानने पुंछ जिल्ह्यात गुलपूर सेक्टर आणि खरी करमाडा भागात शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला. या गोळीबारात तीन नागरिकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश आहे. पती-पत्नी आणि त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. भारतीय लष्करानेही पाकच्या गोळीबाराला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. रात्री उशिरापर्यंत हा गोळीबार सुरू होता.

पाकिस्तानी सैन्याकडून शुक्रवारी सात वाजून २० मिनिचांनी गुलपूर सेक्टरमध्ये गोळीबार करण्यात आला. पाकिस्तानने नियंत्रण रेषेवरील चौक्यांना लक्ष्य केलं. त्याचदरम्यान खरी करमाडा भागातही भारतीय लष्कराच्या चौक्यांवर गोळीबार केला गेला. पाकचा एक गोळा करमाडा गावातील महमद रफीक यांच्या घरावर पडला. यामुळे महमद रफीक, त्यांची पत्नी राफिया बी आणि १५ वर्षाचा मुलगा इरफान यांचा मृत्यू झाला. पाकच्या या गोळीबाराला भारतीय लष्कराकडूनही प्रत्युत्तर दिले गेले.