रामनवमीनिमित्त देशभर जल्लोष साजरा करण्यात आला. परंतु, या जल्लोषाला पश्चिम बंगालमध्ये गालबोट लागले आहे. रामनवमीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीत दगडफेक करण्यात आला आहे. पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद येथील शक्तीपूर परिसरात हा हिंसाचार घडला. यामुळे या भागात १४४ कलमान्वये संचारबंदी लागू करण्यात आली.

या घटनेचे व्हीडिओ समोर आले आहेत. त्यानुसार, मिरवणुकीत घरांच्या छतावरून दगडफेक केली जात असल्याचं दिसत आहे. परिणामी, जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी सांगितलं की, परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली असून अतिरिक्त फौजफाटा या भागात रवाना करण्यात आला आहे. तर, जखमींना बेहरामपूर येथील मुर्शिदाबाद मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

भाजपाची काँग्रेसवर टीका

परंतु, भाजपाच्या बंगाल युनिटने याप्ररकणी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावरच आरोप केला आहे. “प्रशासनाची सर्व योग्य परवानगी असलेल्या शांततापूर्ण रामनवमी मिरवणुकीवर शक्तीपूर येथील बेलडांगा – II ब्लॉक, मुर्शिदाबाद येथे हल्लेखोरांनी हल्ला केला. यावेळी पोलिसांनी या भीषण हल्ल्यात हल्लेखोरांना सामील करून अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. मिरवणूक थांबवण्यासाठी आणि रामभक्तांना पांगवण्यासाठी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या”, असे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी म्हणाले.

भाजपाला काँग्रेसचं प्रत्युत्तर

बेरहामपूरचे खासदार आणि काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी बुधवारी संध्याकाळी येथे भेट दिली. भाजपाच्या आरोपावर काँग्रेसने प्रत्युत्तर दिलं आहे. “ही दंगल भाजपाकडून पूर्वनियोजित होती. आणि भाजपाच्या निषेधाने ते सिद्ध होते. मी निवडणूक आयोगाशी यासंदर्भात बोललो आहे. शक्तीपूरला अतिरिक्त फौजफाटा रवाना करण्यात आला आहे आणि पोलीस अधिक्षकही घटनास्थळी आहेत. मी निवडणूक आयोगाच्या सतत संपर्कात”, असं रंजन चौधरी म्हणाले.

ममता बॅनर्जींनी दिला होता इशारा

रामनवमीनिमित्त दंगल घडू शकते, असा इशारा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आधीच दिला होता. त्यानंतर मुर्शिदाबादमध्ये ही घटना घडली. “आजही भाजपाच्या सूचनेनुसार मुर्शिदाबादचे डीआयजी बदलण्यात आले. आता मुर्शिदाबाद आणि मालदा येथे दंगल झाली तर त्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असेल. भाजपाला दंगल आणि हिंसाचार घडवण्यासाठी पोलीस अधिकारी बदलायचे होते. जर एकही दंगल झाली तर निवडणूक आयोग जबाबदार असेल कारण ते येथे कायदा आणि सुव्यवस्था पाहत आहेत”, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या.