लॉकडाउनच्या काळात देशभरात विविध ठिकाणी अडकून पडलेल्या सर्व प्रकारच्या प्रवाशांसाठी केंद्र सरकारनं विशेष रेल्वे सेवा सुरु करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार, आजपासून ही सेवा सुरु होत आहे. यासाठी आयआरसीटीसी या रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावरुन ऑनलाइन तिकीट विक्री सुरु करण्यात आली होती. त्यानुसार, सोमवारी (११ मे) केवळ तीन तासांत ५४,००० प्रवाशांपैकी ३०,००० तिकिटं बुक झाली. विशेष म्हणजे या बुकिंगमधून रेल्वेला १० कोटींचा महसूल मिळाला. दरम्यान, मुंबई-दिल्ली मार्गावरील १२ ते १७ मे या कालावधीत सुटणाऱ्या गाड्यांसाठीची संपूर्ण बुकिंग फुल्ल झालं आहे.

मंगळवारपासून ज्या विशेष वातानुकुलित रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहेत, त्या १५ गाड्यांच्या जोड्यांची माहिती रेल्वेने यापूर्वीच जाहीर केली आहे. कोविड -१९ आजाराच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळं सर्व प्रवाशी रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यानंतर ५० दिवसांनंतर आता या विशेष गाड्या सोडण्यात येत आहेत.

सोमवारी संध्याकाळी ४ वाजेपर्यंत हजारो लोक इच्छित स्थळी जाण्यासाठी तिकीट बुकिंगासाठी वेटिंगवर होते. लोकांनी ऑनलाइन बुकिंगसाठी आयआरसीटीसीच्या साईटवर संध्याकाळी ४ वाजता एकच गर्दी केल्यानं ती क्रॅश झाली. त्यामुळे पुन्हा दोन तास उशीरानं म्हणजेच संध्याकाळी ६ वाजता बुकिंगला सुरुवात झाली. दरम्यान, बुकिंग सुरु झाल्यानंतर पहिल्या दहाच मिनिटांत हावडा-नवी दिल्ली रेल्वे गाडीची सर्व तिकीट बुक झाली. ही रेल्वे आज (मंगळवार) संध्याकाळी ५.०५ मिनिटांनी सुटणार आहे.

इकॉनॉमिक टाइम्सनं रेल्वे अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं वृत्त देताना म्हटलं की, “सोमवारी संध्याकाळी रेल्वेच्या बुकिंगला सुरुवात झाल्यानंतर रात्री ९ वाजेपर्यंत केवळ तीन तासांत ९.९ कोटी रुपयांची तिकीट विक्री झाली. मुंबई-दिल्ली मार्गावरील १२ ते १७ मे या कालावधीत सुटणाऱ्या गाड्यांसाठीची संपूर्ण बुकिंग फुल्ल झालं आहे. तसेच भुवनेश्वर-नवी दिल्ली या गाडीसाठीची तिकिटं ६.३० वाजताच पूर्ण विकली गेली. त्याचबरोबर इतर काही मार्गावर सोडण्यात येणाऱ्या गाड्यांची तिकीट अद्याप उपलब्ध आहेत,” असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. देशभरातील सर्व मुख्यमंत्र्यांनी सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वेसेवा पुन्हा सुरु करण्याचा संदर्भ दिला होता.

या प्रवासादरम्यान पाळावयाचे काही नियमही प्रशासनानं घालून देण्यात आले आहेत. यामध्ये प्रत्येकानं तोंडाला मास्क लावणे बंधनकारक करण्यात आलं आहे. त्याचबरोबर प्रवाशांना तातडीच्या सेवेसाठी आपल्या मोबाईलमध्ये ‘आरोग्य सेतू’ अॅप डाउनलोड करावं लागणार आहे. प्रवाशांची रेल्वे स्थानकावर स्क्रिनिंग करण्यात येणार आहे. तसेच प्रवाशांना स्वतःचं ब्लँकेट, पाणी आणि जेवण स्वतःच घेऊन यायचं आहे. ही सुविधा त्यांना रेल्वेकडून पुरवण्यात येणार नाही.

प्रवाशांना ऑनलाइन किंवा मोबाईल अॅपच्या माध्यमातून आठवडाभर आधी तिकीट बुक करता येणार आहे. तसेच रद्द तिकीटाची बुकिंग होणार नाही तसेच वेटिंग लिस्टच्या प्रवाशांना प्रवास करता येणार नाही, असंही रेल्वेनं स्पष्ट केलं आहे.