अभिनेता फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांच्या मालकीच्या एक्सेल एंटरटेनमेंटमध्ये काम करणारा अभिनेता विश्वा भानू सध्या चर्चेत आहे. सर्वत्र दिवाळी उत्साहात साजरी केली जात असताना भानू यांना वेगळ्याच प्रसंगाचा सामना करावा लागला आहे. मी राहत असलेल्या मुस्लिम सोसायटीमधील रहिवासी दिवाळी साजरी करण्यास मज्जाव करत असल्याची तक्रार भानूंनी केली आहे. ट्विटरद्वारे विश्वा भानू यांनी याबाबत तक्रार केली असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही टॅग केलंय.

“मी मुंबईच्या मालवणी परिसरातील एका मुस्लिम सोसायटीमध्ये राहतो. पण गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही सोसायटीतील रहिवाशांनी माझ्या पत्नीला घराबाहेर रांगोळी काढण्यापासून व दिवे लावण्यापासून रोखलं. घर सजवण्यावरुन माझ्याशी व पत्नीशी वाद घालण्यास सुरुवात केली. इतकंच नाही तर त्यांनी बळजबरीने दिव्यांची नासधूस केली आणि रोषणाई देखील काढून टाकली”, असं ट्विट भानू यांनी केलं आहे. गेल्या वर्षीही दिवाळी साजरी करु दिली नव्हती असं देखील त्यांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केलंय. तर, दुसऱ्या एका ट्विटमध्ये, “मी याबाबत पोलीस स्थानकात तक्रार केली असून पोलिसांनीच मला याबाबत ट्विट करण्यास सांगितले”, असे भानूने म्हटलंय.

अभिनेता अक्षय कुमारचा  ‘स्पेशल 26’, ‘मर्दानी’, आणि ‘रघु रेमो’ यांसारख्या सिनेमांमध्ये भानूने काम केलंय. सोशल मीडियावरील विश्वा भानूंची ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. फेसबुकवर त्यांच्या पोस्टला आतापर्यंत जवळपास २ हजार युजर्सनी शेअर केलंय तर १५०० पेक्षा जास्त प्रतिक्रिया त्यावर आल्यात.