बलिया : गंगा नदीत आणखी सात मृतदेह वाहून आल्याचे दिसल्यानंतर, उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यात सापडलेल्या मृतदेहांची संख्या ५२ वर पोहचली आहे, असे बुधवारी एका अधिकाऱ्याने सांगितले. मृत व्यक्तींना करोनाचा संसर्ग झाला असल्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन या मृतदेहांवर तत्काळ अंत्यसंस्कार करत आहे.

बलियाच्या नागरिकांच्या सांगण्यानुसार, उजियार, कुल्हाडिया व भरौली या घाटांजवळ मंगळवारी सकाळी किमान ४५ मृतदेह तरंगत असल्याचे आढळून आले. मंगळवारी उशिरा रात्री आणखी ७ मृतदेह आढळल्यामुळे त्यांची एकूण संख्या ५२ वर पोहचली, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. कुजलेल्या स्थितीत असलेले काही मृतदेह बलिया- बक्सर पुलानजीक तरंगत असल्याचे आढळल्याचे जिल्हा दंडाधिकारी आदिती सिंह यांनी मंगळवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. उपविभागीय दंडाधिकारी राजेश यादव आणि मंडळ अधिकारी जगवीर सिंह चौहान या प्रकाराचा तपास करत असून, मृतांबाबत योग्य तो आदर राखून अंत्यसंस्कार करण्यात आले असे त्यांनी सांगितले.