काँग्रेस पक्ष सध्या अनेक आर्थिक संकटांशी मुकाबला करीत आहेत. त्याचा परिणाम म्हणजे काँग्रेसजवळ २०१९च्या निवडणुकीत मोदींचा मुकाबला करण्यासाठी देखील पैसे शिल्लक राहिलेले नाहीत. गेल्या पाच महिन्यांपासून काँग्रेस नेतृत्वाने अनेक राज्यात आपली कार्यालये चालवण्यासाठी लागणारा निधी देणे बंद केले आहे. याची माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर अनेक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. तर, काँग्रेसने आपल्या नेत्यांना देणग्या वाढवण्याचा आणि खर्चांमध्ये कपात करण्याचा सल्ला दिला आहे.

राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षामध्ये व्यावसायीकांकडून येणाऱ्या निधीमध्ये घट झाली आहे. सध्या काँग्रेसकडे पैशाची इतकी मोठी समस्या निर्माण झाली आहे की, त्यांना त्यांच्या एका उमेदवाराच्या मदतीसाठी वर्गणी मागून पैसा जमा करावा लागला होता. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

काँग्रेसचे सोशल मीडिया प्रभारी दिव्य स्पंदन राम्या यांनी सांगितले की, आमच्याकडे सध्या आर्थिक चणचण आहे. भाजपाच्या तुलनेत आमच्याकडे निवडणुक बॉण्डमधून खूपच कमी पैसे मिळत आहेत. निवडणूक बॉण्ड हे राजकीय पक्षांना देणग्या देण्याचा नवा पारदर्शी प्रकार आहे. काँग्रेसजवळ आता यामार्गाने गरजेप्रमाणे पैसे येत नाहीत. त्यासाठी काँग्रेसला पैसे जमवण्यासाठी ऑनलाइन मदतीचे आवाहन करावे लागले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या जोडीच्या राजकारणाने काँग्रेसला जवळपास सर्वच मोठ्या निवडणुकांमध्ये हारवले आहे. भाजपा सध्या आपल्या सहकारी पक्षांसोबत देशातील २० राज्यांमध्ये सत्तेत आहे. तर २०१३मध्ये १५ राज्यांत सत्तेत असलेली काँग्रेस सध्या २ राज्यांतच सत्तेत आहे.

काँग्रेसने मार्च २०१७ मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात भाजपाच्या तुलनेत एक चतुर्थांश निधी जमा केला आहे. भाजपाने या काळात सुमारे ६५,३१७ कोटी रुपयांच्या देणग्या मिळवल्या आहेत. भाजपाच्या या कमाईत गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे ८१ टक्के वाढ झाली आहे. लोकशाही सुधार संघटन अंतर्गत काँग्रेस यंदा केवळ १४,२१३ कोटी रुपयेच जमा करु शकली आहे. यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे १४ टक्के घट नोंदवण्यात आली आहे.