पीटीआय, कोलकाता

निवडणूक रोखे हा केवळ देशातील नव्हे, तर जगातील सर्वात मोठा घोटाळा आहे. हा भ्रष्टाचार उघड झाल्यानंतर आता दोन आघाडय़ांमधील लढाई राहिली नसून भाजप विरुद्ध भारतीय जनता, असा लढा सुरू झाला आहे अशी टीका ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ व केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती परकला प्रभाकर यांनी केली आहे. एका वृत्तवाहिनीला अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत प्रभाकर यांनी केंद्र सरकारच्या धोरणांचा खरपूस शब्दांत समाचार घेतला.

निवडणूक रोख्यांच्या घोटाळय़ाची अद्याप तितकीशी चर्चा होताना दिसत नाही. मात्र आगामी काळात हा मुद्दा अधिक ऐरणीवर येणार असून त्यासाठी जनता सत्ताधाऱ्यांना धडा शिकवेल, असे प्रभाकर यांनी सांगितले. या रोखठोक वक्तव्यानंतर काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. ‘‘प्रभाकर खरेच बोलत आहेत. मी त्यांचे आभार मानतो. ते प्रामाणिक, रोखठोक व धोरणी असल्यामुळे असल्यामुळे असे बोलू शकले,’’ अशी प्रतिक्रिया चौधरी यांनी दिली.

हेही वाचा >>>विश्लेषण : देशातील बेरोजगारांमध्ये ८३ टक्के तरुण! ILO च्या अहवालामध्ये आणखी कोणता धक्कादायक तपशील?

अर्थमंत्री परिस्थितीच्या बळी – चौधरी

आपल्याकडे पैसे नसल्यामुळे निवडणूक लढत नसल्याच्या सीतारामन यांच्या विधानावरून अधीर रंजन चौधरी यांनी जोरदार टोलेबाजी केली. केंद्रीय अर्थमंत्री या परिस्थितीच्या बळी ठरत आहेत. दक्षिण भारतात निवडणूक लढण्यास बराच पैसा लागत असेल आणि सीतारामन अप्रामाणिक आहेत, असे आम्ही कधीही म्हटलेले नाही अशी प्रतिक्रिया चौधरी यांनी दिली.