नवी दिल्ली : भाजपच्या राजकारणाने मणिपूरमध्ये भारतमातेची हत्या केली आहे. तिथल्या लोकांची हत्या केली आहे. भाजप आणि केंद्र सरकार देशद्रोही आहे आणि म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरला गेले नाहीत, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे माजी अध्यक्ष व वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी बुधवारी लोकसभेत केली. अविश्वास ठरावावरील चर्चेच्या दुसऱ्या दिवशी गांधी यांनी केलेल्या या भाषणामुळे सत्ताधारी बाकांवरील सदस्य प्रचंड संतप्त झाले. पंतप्रधान मणिपूरला गेले नाहीत. कारण ते मणिपूरला भारताचा भाग मानत नाहीत. मी ‘मणिपूर’ हा शब्द वापरला, पण सत्य असे आहे की, मणिपूर आता उरलेले नाही. तुम्ही मणिपूरचे दोन तुकडे केले आहेत. केंद्र सरकार लष्कराला तिथे पाचारण करून मणिपूरमधील हिंसाचार ताबडतोब थांबवू शकले असते पण, तिथे अद्यापही कारवाई केलेली नाही, असा संताप राहुल गांधींनी व्यक्त केला. रामायणाचा उल्लेख करत राहुल गांधी म्हणाले की, रावणाचा वध रामाने केला नाही तर, त्याच्या अहंकाराने केला. देशाचा आवाज ऐकायचा असेल तर अहंकार सोडावा लागेल! गुरुग्राम व नूह येथे जातीय संघर्षांमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तुम्ही सर्वत्र रॉकेल शिंपडले आहे, मणिपूरला आग लावली आहे, तुम्ही आता हरियाणातही तेच करत आहात, असा आरोप गांधी यांनी केला. राहुल गांधी यांच्या जहाल भाषेमुळे भाजप सदस्य प्रचंड आक्रमक झाले. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी, राहुल गांधींनी देशाची माफी मागावी, अशी मागणी केली. घाबरू नका, अदानीवर बोलणार नाही! खासदारकी पुनस्र्थापित झाल्यानंतर लोकसभेतीतील राहुल गांधींचे हे पहिले भाषण होते. सुरुवातीला त्यांनी सदस्यत्व बहाल केल्याबद्दल लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांचे आभार मानले. मी लोकसभेत शेवटचा बोललो तेव्हा माझ्या बोलण्याचा तुम्हाला (भाजप) खूप त्रास झाला होता कारण, मी अदानींवर बोललो होतो. त्यामुळे तुमच्या वरिष्ठ नेत्याच्या मनाला ठेच लागली होती. त्याचा तुमच्यावरही परिणाम झाला असेल. त्याबद्दल मी तुमची माफी मागतो. पण, मी खरे बोललो. आज तुम्हाला घाबरण्याची गरज नाही, मी आज अदानीवर बोलणार नाही, असे शाब्दिक चिमटे राहुल गांधींनी भाजप सदस्यांना काढले. मणिपूरचे विदारक अनुभव मणिपूरच्या भेटीतील काही अनुभवांबद्दल राहुल गांधी म्हणाले की, मी एका महिलेला विचारले, ‘तुझ्यासोबत काय झाले?’, ती म्हणाली, ‘माझ्या एकुलत्या एक मुलाला माझ्या डोळय़ासमोर गोळी झाडली. मी माझ्या मुलाच्या मृतदेहासोबत संपूर्ण रात्र काढली. मग, मला भीती वाटू लागली. मी माझे घर सोडले’. मेघनाद आणि कुंभकर्ण.. रावण केवळ दोन व्यक्तींचेच ऐकत असे. मेघनाद आणि कुंभकर्ण.. त्याला अन्य कोणाचा आवाज ऐकू येत नसे. त्याप्रमाणेच पंतप्रधान मोदींनाही मणिपूरच्या लोकांचा आवाज ऐकू येत नाही. त्यांना केवळ अमित शहा व गौतम अदानी या दोघांचेच आवाज ऐकू येतात, असा टोमणा राहुल यांनी लगावला. भारत हा आवाज आहे, हृदयाचा आवाज आहे. तुम्ही (भाजप) तो आवाज मणिपूरमध्ये मारला आहे. माझी आई इथे बसली आहे. दुसरी आई म्हणजे भारतमाता.. तिला तुम्ही मणिपूरमध्ये ठार मारले आहे. तुम्ही भारतमातेचे मारेकरी आहात. - राहुल गांधी, खासदार, काँग्रेस