अनेकतत्त्ववाद आणि सहिष्णुता ही भारतीय संस्कृतीची वैशिष्टय़े असल्याचे मत राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी शनिवारी येथे व्यक्त केले. जातीय तणावाचा कुरूप चेहरा कोठेही समोर येऊ शकतो त्यापासून सावध राहावे, असे आवाहनही राष्ट्रपतींनी जनतेला केले.
काँग्रेसचे दिवंगत नेते अर्जुनसिंह यांच्या स्मृत्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेत मुखर्जी बोलत होते. अनेकतत्त्ववाद लोकशाहीत सहिष्णुता, विरोधी मतांचा आदर करणे आणि सहनशीलता ही मूल्ये नागरिकांमध्ये विशेषत: युवकांच्या अंगी बाणवणे महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले.
अनेकतत्त्ववाद आणि सहिष्णुता ही आपल्या संस्कृतीची वैशिष्टय़े आहेत, हे महत्त्वाचे तत्त्वज्ञान असून ते अखंड राहिले पाहिजे, भारताच्या वैविध्यतेतच देशाची ताकद आहे, देशातील वैविध्यता ही वस्तुस्थिती आहे, अनेकतत्त्ववाद हा अनेक शतकांपासून आलेल्या कल्पनांची एकरूपता आहे, असे मुखर्जी म्हणाले.
भारताला सहिष्णुतेमधून बळकटी मिळाली आहे, अनेक मतेमतांतरे आहेत, आपण त्यावर वाद करू शकतो, काही मते आपल्याला पटत नाहीत, परंतु आवश्यक असलेली मतमतांतरे आपण नाकरू शकत नाही, असेही राष्ट्रपती म्हणाले.