दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या धर्तीवर रेल्वेसाठी नियामक संस्था स्थापन केली जाणार असून या संस्थेचा आराखडा तयार करण्यास नीती आयोगाला सांगण्यात आले आहे, असे रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले.
ही नियामक संस्था स्वतंत्र राहणार असून खासगी भागीदारी आणताना काळजी घेण्यासाठी ही संस्था आवश्यक असेल असे सांगून प्रभू म्हणाले की, त्याची रचना निश्चित झाल्यानंतर संकेतस्थळावर टाकून चर्चा केली जाईल.
नीती आयोगाचे अध्यक्ष अरविंद पानगरिया यांना संस्थेचा आराखडा तयार करण्यास सांगण्यात आले आहे. रेल्वे प्रवाशांची संख्या कमी होते आहे. त्यावर पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक या राज्यांशी बोलणे झाले आहे. त्यानंतर आता मालवाहतूक व प्रवासी वाहतूक यासाठी योजना आखली जाईल.
रेल्वेत नोकरी देतो त्यासाठी आधी पैसे भरा असे सांगणारी काही पत्रे कुणीतरी पाठवली आहेत. त्याबाबत आपण पोलिसात तक्रार दिली आहे व अनेक ठिकाणी प्राथमिक माहिती अहवाल नोंदवला आहे. कुणीही अशा पत्रांवर विश्वास ठेवू नये असे प्रभू यांनी सांगितले.