प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नावावर 2014 ची निवडणूक जिंकली मात्र आता मोदींच्या नेतृत्वातील एनडीए सरकारच्या कामावर 2019 ची ही निवडणूक आम्ही जिंकली आहे. नरेंद्र मोदींची हवा नाही म्हणणाऱ्या गांधी परिवाराचा करिष्मा देशातून संपला असून जनतेच्या मनात मोदींची केवळ हवा नव्हती तर तुफान होते हे या लोकसभा निवडणुकीच्या निकालाने स्पष्ट झाले आहे अशी प्रतिक्रिया रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे.

रामदास आठवले यांनी वांद्रे येथील संविधान बंगल्यावर रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि लाडू वाटप करून एनडीएच्या महाविजयाचे जल्लोषात स्वागत केले. या जल्लोषात रामदास आठवले, त्यांच्या पत्नी सीमाताई आठवले, पुत्र सहभागी झाले होते. महाराष्ट्रात 48 जागांपैकी 42 जागा महायुतीने जिंकत असल्याचा निकाल येत असल्याने रामदास आठवले यांनी राज्यातील आंबेडकरी जनतेचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

काँग्रेसमुक्त महाराष्ट्र होत आहे. काँग्रेस आणि विरोधकांच्या अपप्रचाराला देशभरातील दलित बहुजन जनतेने भीक घातली नाही. मोदींच्या आणि एनडीएला देशभरातील आंबेडकरी जनतेने ; दलित बहुजनांनी भरीव मतदान देऊन खंबीर साथ दिल्याबद्दल दलित बहुजन आंबेडकरी जनतेचे रामदास आठवले यांनी मनःपूर्वक आभार मानले आहेत.

राष्ट्रवादी चे नेते शरद पवार यांनी काँग्रेसला साथ देणे योग्य नव्हते तसेच त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींवर अनावश्यक टीका करायला नको होती. शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याने काँग्रेससोबत राहण्यापेक्षा एनडीएमध्ये यायला हवे. त्यांच्यासारख्या ज्येष्ठ अनुभवी नेत्याने एनडीएसोबत राहिले पाहिजे असे आवाहन रामदास आठवले यांनी केले. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी ही एनडीएचे दरवाजे सर्वांसाठी खुले असल्याचे आवाहन केले असल्याची आठवण यावेळी आठवलेंनी केली.