जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवल्यानंतर सैरभैर झालेल्या पाकिस्तानने जागतिक स्तरावर भारताविरोधात भुमिका मांडण्याचा वारंवार प्रयत्न केला. मात्र, यात त्यांना वेळोवेळी अपयश आले. यामुळे निराश झालेल्या पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांनी खंत व्यक्त केली की, “काश्मीरच्या मुद्द्यावर जग पाकिस्तानवर भरवसा करण्यास तयार नाही. कारण, जगात पाकिस्तानची प्रतिमा बेजबाबदार राष्ट्र म्हणून झाली आहे.”

एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीवर बोलताना पाकिस्तानचे गृहमंत्री एजाज अहमद शाह यांनी मान्य केले की, पाकिस्तानात दहशतवादी संघटना अस्तित्वात असून इम्रान खान सरकारने जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेवर अब्जावधी रुपये खर्च केले आहेत. आंतरराष्ट्रीय संघटनांकडून या संघटनांवर प्रतिबंध लावल्याप्रकरणी ते म्हणाले, “या त्याच दहशतवादी संघटना आहेत ज्यांनी अफगाणिस्तानमध्ये युद्ध आणि काश्मीरमध्ये अशांतता परवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. महिन्याभरापूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी देखील म्हटले होते की, ३० ते ४० हजार दहशतवाद्यांनी पाकिस्तानात प्रशिक्षण घेतले आहे. ते हेच दहशतवादी आहेत ज्यांनी अफगाणिस्तान आणि काश्मीरच्या संघर्षात सहभाग घेतला होता. मात्र, यावेळी गृहमंत्री एजाज शाह यांनी जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरच्या सुटकेवर सरकारची भुमिका काय या प्रश्नाचे उत्तर देण्याचे टाळले.

एजाज शाह म्हणाले, “काश्मीरबाबत आम्ही जगाला सांगतोय की, तिथे कर्फ्यू लावण्यात आला आहे. लोकांना औषधेही मिळत नाहीएत, लोक मरत आहेत. मात्र, जग आमच्यावर विश्वास ठेवत नाहीये. जगाचा भारतावरच विश्वास आहे, कारण अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय स्तरावर विश्वास संपादन करणे एका दिवसात होणारी गोष्ट नाही त्याला अनेक वर्षे जावी लागतात.”

दरम्यान, आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानने विश्वास गमावल्याचे खापर शाह यांनी पूर्वीच्या सरकारांवर फोडले आहे. ते म्हणाले, “पाकिस्तानात यापूर्वी सत्तेत असलेल्या श्रीमंत वर्गाने देश बरबाद केला आहे. त्यांनी या देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर खराब केले आहे. आपण सर्वकाही गमावून बसलो आहोत, आता लोक म्हणत आहेत की आपण एक जबाबदार राष्ट्र नाही. यासाठी जिया-उल-हक, बेनझीर भुट्टो, परवेज मुशर्रफ आणि इम्रान खान हे सर्वजण यासाठी जबाबदार असल्याचे त्यांनी चर्चेदरम्यान उत्तर देताना म्हटले आहे.