Tomato Price Hike in India : टोमॅटोच्या किमती गगनाला भिडत आहेत. १५० पार किमती झाल्याने सामान्य माणसाच्या जेवणातून टोमॅटो हद्दपार झाला आहे. विविध ठिकाणी किरकोळ बाजारात टोमॅटो किमती भिन्न आहेत. परंतु, प्रत्येक ठिकाणी त्याची किमती १५० च्या वर आहेत. टोमॅटोमुळे सामान्य नागरिकांचं बजेट कोलमडलं असल्याने काँग्रेसने यावरून हल्लाबोल केला आहे. काँग्रेसच्या ट्वीटर हँडलवरून एक प्रश्न विचारण्यात आला आहे. त्यांच्या या प्रश्नाला विभिन्न उत्तरे मिळाली आहेत. "तुमच्या येथे टोमॅटो किती रुपये किलो आहेत?" असा प्रश्न विचारून "या प्रश्नाचं उत्तर द्या" असं काँग्रेसने ट्वीटमध्ये म्हटलं आहे. त्यांच्या या ट्वीटला असंख्य उत्तरे आली आहेत. काहींच्या येथे १६० तर काही ठिकाणी २६० रुपये किलो टोमॅटो असल्याचं कमेटंमध्ये म्हटलं आहे. तर, "आम्ही टोमॅटो खाणंच सोडून दिलं आहे", असं काही नेटिझन्स म्हणत आहेत. "पावसाळ्यानंतर टोमॅटो स्वस्त होतील. परंतु, आम्हाला टोमॅटो किंवा पेट्रोल स्वस्त होण्याची नाही तर समान नागरी कायदा आणि एनआरसीची प्रतिक्षा आहे. तुम्हीही याच प्रतिक्षेत आहात का?" असा बोचरा प्रश्न एका नेटिझन्सने काँग्रेसच्या या ट्वीटवर विचारला आहे. एकाने म्हटलं आहे की, "टोमॅटो कितीही किलो झाले तरीही मतदान मात्र मोदींना करणार आहोत. तर एकजण म्हणतोय की, केंद्र सरकारने टोमॅटो ८० रुपये किलोने विकायला सुरुवात केली आहे. तुम्हीही खरेदी करा." "छत्तीसगड, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, राजस्थान या राज्यातीलही टोमॅटोच्या किमती सांगा. टोमॅटोच्या किमती स्थानिक बाजार समितीमार्फत नियंत्रित केली जाता, पीएमओद्वारे नाहीत", अशी खोचक टीकाही एका नेटिझनने केली आहे. हेही वाचा >> …म्हणून नेपाळमधून स्वस्तात टोमॅटो विकत घेतात लोक, ‘असा’ करतात जुगाड "टोमॅटोच्या किमतीवरून सुरू असलेलं राजकारण थांबवा. हवामान आणि पावसामुळे याच्या किमती वाढल्या आहेत. दरवर्षी किमती वाढतात. यावर्षी जास्त पाऊस पडल्याने किमती जास्त प्रभावित झाल्या आहेत. इतर तार्किक मुद्द्यांवर राजकारण करा. टोमॅटोच्या किमतीवरून सरकारवर टीका करताना तुम्ही तुमचंच हसं करून घेताय", असंही एका नेटिझनने म्हटलं आहे. "टोमॅटो टोमॅटो काय करत बसलात, आमया गुजरातमध्ये टोमॅटो इतके स्वस्त आहेत की टोमॅटो कुत्र्यांना खाऊ घालतात. आणि स्वस्त नसलं तरीही आम्हाला काहीही त्रास नाहीय. राहुल गांधींना सांगा काही दिवस आमच्या गुजरातमध्ये येऊन राहा", असंही एका ट्विटर युजरने म्हटलं आहे. केंद्र सरकारकडून टोमॅटो ८० रुपये किलो दरम्यान, टोमॅटोच्या किमती नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलली आहेत. कर्नाटक, आंध्र प्रदेश, महाराष्ट्रातून टोमॅटो खरेदी करून एनसीसीएफ मधून ग्राहकांना थेट ९० रुपये प्रति किलो दराने विकले जात होते. ग्राहक व्यवहार मंत्रालयाने टोमॅटो ९० रुपये किलो दराने विकण्याची घोषणा केली होती. आता. ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या अखत्यारितील राष्ट्रीय ग्राहक सहकारी महासंघाने टोमॅटोच्या किमती कमी केल्या असून आता टोमॅटो ८० रुपये किलो दराने विकण्यात येणार आहे.