पीटीआय, वायनाड काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड येथे मानव आणि वन्य प्राण्यांमधील संघर्षांमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा रविवारी सकाळी आढावा घेतला. राहुल सध्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’बरोबर मणिपूर ते मुंबई असा प्रवास करत आहेत. मात्र, त्यांच्या मतदारसंघातील परिस्थिती चिघळल्यामुळे शनिवारी संध्याकाळी प्रयागराज येथे यात्रा स्थगित करून ते वायनाडला रवाना झाले. वायनाड जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांमध्ये वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांमध्ये तिघांचा मृत्यू झाल्यामुळे जनतेमध्ये आक्रोश आहे. गेल्या आठवडय़ात बुधवारी कर्नाटकमधून आलेल्या हत्तीच्या हल्ल्यामध्ये अजीश या व्यक्तीचा तर शुक्रवारी पॉल या वन कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता. दोन महिन्यांपूर्वी प्रजीश हे वाघाच्या हल्ल्यात ठार झाले होते. यामुळे संतप्त स्थानिकांनी शनिवारी केलेल्या निदर्शनांना हिंसक वळण लागले. हेही वाचा >>>भारतीय अन्न महामंडळाचे भागभांडवल २१ हजार कोटींवर, केंद्र सरकारचा निर्णय; कृषी अर्थव्यवस्थेला मिळणार बळ राहुल यांनी रविवारी सकाळी कलपेट्टा येथे जिल्हा प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून त्यांच्याकडून माहिती घेतली. तसेच मृतांच्या नातेवाईकांना कोणत्याही विलंबाविना नुकसानभरपाई देण्याचीही विनंती केली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना राहुल म्हणाले की, मला या विषयाचे राजकारण करायचे नाही. मात्र, त्यांनी वायनाड वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयात सुविधा उपलब्ध नसल्याबद्दल चिंता व्यक्त केली. त्यापूर्वी राहुल यांनी तीन वेगवेगळय़ा प्राणी हल्ल्यांमध्ये मरण पावलेल्या अजीश, पॉल आणि प्रजीश यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यानंतर माध्यमांशी बोलताना पॉल यांची मुलगी सोना हिने सांगितले की राहुल गांधींनी तिच्या शिक्षणाची काळजी घेण्याचे तसेच वायनाड वैद्यकीय महाविद्यालयाशी संबंधित गरजांकडे लक्ष देण्याचे आश्वासन दिले आहे. अजीश यांची मुलगी अल्ना हिने देखील वैद्यकीय सुविधा तातडीने सुधारणा करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. तर प्राणीहल्ल्यातील अन्य एक बळी प्रजीश यांचे बंधू मजीश यांनी राहुल यांच्याकडे रस्त्यांमार्फत दळणवळण सुविधा सुधारण्याची विनंती केली. हे सर्व मुद्दे आपण जिल्हा प्रशासनाकडे उपस्थित केल्याचे राहुल यांनी बैठकीनंतर सांगितले. हेही वाचा >>>“फोडाफोडी करुन भाजपाला २०० जागाही मिळणार नाहीत”, ठाकरे गटाच्या ‘या’ नेत्याचा दावा केंद्र, राज्य सरकारच्या हस्तक्षेपाची मागणी कोची : वायनाडमध्ये निर्माण झालेल्या मानव आणि जंगली प्राणी संघर्षांमध्ये केंद्र सरकार तसेच राज्य सरकारने हस्तक्षेप करावा अशी विनंती राज्यातील कॅथलिक चर्चची सर्वोच्च संस्था ‘केरळ कॅथलिक बिशप्स कौन्सिल’ने रविवारी केली. दोन्ही सरकारांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहावे असे कौन्सिलने सुचवले आहे.