लग्नाचा शब्द देऊन फसवणूक करणाऱ्या प्रियकराविरोधात प्रेयसीने बलात्काराची तक्रार नोंदवली आहे. आपल्याला लग्न करायचे आहे असे सांगून आरोपी मला त्याच्यासोबत दिल्ली येथे घेऊन गेला. तिथे त्याने आठ दिवस माझ्यावर बलात्कार केला व नंतर मला तिथेच सोडून पळून गेला असे पीडित महिलेने तिच्या तक्रारीत म्हटले आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

पीडित महिला अहमदाबाद येथे राहते. पीडित महिलेचे नऊ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. पहिल्या पतीपासून तिला दोन मुले आहेत. ही महिला तिच्या वैवाहिक आयुष्यात त्रस्त होती. पती दारु पिऊन तिला मारहाण करायचा. दोन वर्षांपूर्वी तिने पतीला घटस्फोट दिला व ती तिच्या आईकडे रहायला आली. पीडित महिलेने तिच्या एफआयआरमध्ये ही माहिती दिली आहे.

आरोपी पीडित महिलेच्या घराशेजारीच रहायचा. दोघांची ओळख झाल्यानंतर हळूहळू त्यांच्यात मैत्री झाली. आरोपी तिची काळजी घेऊ लागला. आरोपीने तिला लग्नाची मागणी घातली व दिल्लीला जाऊन आपण लग्न करु असे सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेऊन पीडित महिला त्याच्यासोबत जाण्यास तयार झाली. सप्टेंबर महिन्यात दोघे खासगी बसने दिल्लीला रवाना झाले अशी माहिती पोलिसांनी दिली.

दिल्लीत पोहोचल्यानंतर आरोपीने भाडयाने घर घेतले. तिथे तो पीडित महिलेला घेऊन गेला. दिल्लीत असताना आठ दिवस त्याने माझ्यावर बलात्कार केला असे पीडित महिलेने तिच्या तक्रारीत म्हटले आहे. नोकरी शोधायला जातोय असे सांगून घराबाहेर पडल्यानंतर आरोपी पुन्हा परतून आला नाही. पीडित महिलेने त्याला फोन केला तर फोन स्विचऑफ होता. दोन दिवसानंतर महिलेने तिच्या आईला फोन करुन सर्व घडलेला प्रकार सांगितला. आई दिल्लीला जाऊन मुलीला अहमदाबादला घेऊन आली.  प्रियकर परतून येईल म्हणून पीडित महिलेने अडीच महिने त्याची वाट पाहिली. त्यानंतर   तिने पोलिसात तक्रार नोंदवली.