राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मनात पंतप्रधान होण्याची सुप्त इच्छा आहे का? असा सवाल शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीवर मुलाखत देताना, शरद पवार म्हणाले की, २००४ ला मनमोहनसिंग पंतप्रधान होतील, हे कोणाला वाटले नव्हते, कारण त्यांनी लोकसभा निवडणूक लढविली नव्हती. मनमोहन सिंग त्यावेळी राज्यसभेत होते त्यामुळे ते अचानक पंतप्रधान होऊ शकले, या पवारांच्या विधानाचा संदर्भ देऊन तावडे म्हणाले की, यंदा शरद पवार निवडणूक लढवत नाहीत, पण ते राज्यसभेचे सदस्य आहेत. याचाच अर्थ शरद पवार यांच्या मनात पंतप्रधान होण्याची सुप्त इच्छा आहे, ती त्यांनी बहुतेक आपल्या मुलाखतीत बोलून दाखविली असावी, असेही तावडे यांनी सांगितले.

काँग्रेस- राष्ट्रावादीचे जे महागठबंधन आहे, त्यांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार अजूनही ठरलेला नाही, तो निवडणुकीनंतर ठरेल. राहूल गांधी यांना पंतप्रधान होण्याची उत्सुकता नाही, असेही शरद पवार यांनी आपल्या मुलाखतीत म्हटले आहे, तसेच तुटलेल्या फुटलेल्या महाआघाडीत मायावती, ममता बॅनर्जी या सर्वांनाच पंतप्रधान होण्याची इच्छा आहे, परंतु या महाआघाडीत असलेल्या गोंधळामुळे त्यांचा एक उमेदवार निश्चित होत नाही, या परिस्थितीत देशाची जनताही या गोंधळलेल्या महाआघाडीला मतदान करण्याऐवजी एनडीए महायुतीला मतदान करेल, असा विश्वास तावडे यांनी व्यक्त केला.

बुधवारी अंमळनेरमध्ये जी घटना भारतीय जनता पक्षाच्या मेळाव्यात घडली ती अतिशय चुकीची आहे. अशी घटना होणे, हे भाजपला शोभणारी नाही. या घटनेमागे काहीही आणि कोणतेही कारण असले, तरी असा कोणताही प्रकार सहन केला जाणार नाही असे विनोद तावडे यांनी सांगितलं आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मतदार अतिशय उत्साहाने मतदानात सहभागी होत आहेत. हाच उत्साह दिवसभर टिकून राहील आणि सामान्य माणूस आपल्या देशाला योग्य वाटणाऱ्या उमेदवारांना मत देईल, मतांच्या ताकदीच्या माध्यमातून योग्य सरकार निवडून देईल असं विनोद तावडे यांनी म्हटलं आहे.