इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीनंतर झालेल्या १९७७ च्या निवडणुकीत जनता पार्टीचे सरकार आले. मात्र, हे सरकार फार काळ टिकले नाही. सत्तेतून पायउतार झाल्यानंतर जनता पार्टीमध्ये फूट पडली. त्यातूनच आजच्या भारतीय जनता पार्टीचा उदय झाला होता. १९८० च्या निवडणुकीत नेमके काय झाले होते आणि इंदिरा गांधींनी सत्तेत पुनरागमन कसे केले होते, याची माहिती घेऊयात.

पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर जवळपास महिनाभराने म्हणजेच ३० एप्रिल १९७७ रोजी मोरारजी देसाई यांनी काँग्रेसची सत्ता असणाऱ्या नऊ राज्यांमधील सरकारे बरखास्त केली. इंदिरा गांधींनी पोटनिवडणूक जिंकून संसदेत पुन्हा प्रवेश केला होता. डिसेंबर १९७८ साली, इंदिरा गांधींना सभागृहाचा अवमान केल्याबद्दल आणि विशेषाधिकाराचा भंग केल्याप्रकरणी एका आठवड्यासाठी अटक करण्यात आली. आणीबाणीनंतर जनता पार्टीच्या सत्ताकाळात इंदिरा गांधी आणि काँग्रेसबद्दल जनतेच्या मनात असलेला रोष ओसरू लागला आणि काँग्रेसबाबत सहानुभूतीची भावना लोकांमध्ये वाढू लागली. चौधरी चरण सिंह यांनी दुसऱ्यांदा सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यामुळे लोकसभेमधील जनता पार्टीचे संख्याबळ २९८ वरून २४६ वर आले. १० जुलै १९७९ रोजी संसदेचे विरोधीपक्षनेते यशवंतराव चव्हाण यांनी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणत मोरारजी देसाईंना १५ जुलै रोजी पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यायला लावला.

तत्कालीन राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांनी यशवंतराव चव्हाण यांना नवे सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रण दिले, मात्र त्यांनी ते नाकारले. त्यामुळे चौधरी चरण सिंह यांनी २८ जुलै रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. जनता पार्टीतून फुटून त्यांच्याबरोबर आलेल्या गटाला जनता पार्टी (सेक्यूलर) असे नाव देण्यात आले. हे नवे सरकार काँग्रेसच्याच दोन गटांच्या पाठिंब्यावर विसंबून होते. यामध्ये देवराज उर्स यांचा काँग्रेस (यू) पक्ष सत्तेत सहभागी झाला होता; तर इंदिरा गांधींच्या काँग्रेस (आय) पक्षाने बाहेरून पाठिंबा दिला होता.

हेही वाचा : विश्लेषण : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाची पार्श्वभूमी काय? आरोपी कोण? आरोप काय?

पुन्हा लोकसभेची निवडणूक

जुलै १९७९ मध्ये देवराज उर्स यांनी काँग्रेसमधून फुटून नवा पक्ष स्थापन केला होता. ते कर्नाटकचे तत्कालीन मुख्यमंत्री होते. त्यांनी संजय गांधी पक्षाअंतर्गत बाबींमध्ये नको तितकी ढवळाढवळ करत असल्याचा आरोप करत पक्षाला रामराम केला होता. त्यांच्याबरोबर आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष के. ब्रह्मानंद रेड्डीही होते. त्यांनी इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांच्याविरोधात भूमिका घेत काँग्रेस (यू) हा नवा पक्ष स्थापन केला. यामध्ये शरद पवार, ए. के. अँटोनी, सी. सुब्रमण्यम आणि करण सिंग यांसारखे नेतेही होते. चौधरी चरण सिंह यांच्या या नव्या सरकारमध्ये यशवंतराव चव्हाण उपपंतप्रधान आणि गृहमंत्री झाले; तर करण सिंग यांना शिक्षण खाते देण्यात आले.

२० ऑगस्ट १९७९ रोजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांना आपले बहुमत सिद्ध करावे लागले. बहुमत सिद्ध करण्याच्या दिवशी सकाळीच काँग्रेस (आय) पक्षाने चौधरी चरण सिंह यांचा पाठिंबा काढून घेतला. देशातील जाट समाजाचे नेते असलेले चौधरी चरण सिंह आपल्या पंतप्रधान पदाचा एक महिनाही पूर्ण करू शकले नाहीत. बहुमत सिद्ध करण्यास सक्षम नसल्याने त्यांनी २२ ऑगस्ट १९७९ रोजी लोकसभा बरखास्त करण्याचा सल्ला राष्ट्रपतींना दिला. लोकसभा बरखास्त झाल्यानंतर राज नारायण यांच्या नेतृत्वातील जनता पार्टीने निवडणूक आयोगासमोर आपणच खरी जनता पार्टी असल्याचा दावा केला. मात्र, त्यांचा हा दावा धुडकावून लावण्यात आला आणि सप्टेंबर १९७९ रोजी चौधरी चरण सिंह यांच्या जनता पार्टी (सेक्यूलर) ला राष्ट्रीय पक्षाची मान्यता देण्यात आली. त्यांना ‘चक्र आणि नांगर धरुन उभा असलेला शेतकरी’ हे चिन्ह देण्यात आले. त्यानंतर त्यांनी पक्षाचे नाव ‘लोक दल’ असे केले.

इंदिरा गांधींचे पुनरागमन

त्यानंतर पुढील लोकसभेची निवडणूक १९८० साली घेण्यात आली. ३ जानेवारी आणि ६ जानेवारी रोजी मतदान पार पडले. पहिल्यांदाच कडाक्याच्या थंडीत लोकसभेची निवडणूक पार पडत होती. या निवडणुकीमध्ये प्रथमच प्रत्येक लोकसभा मतदारसंघात दोन-तीन निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. यापूर्वी १९७८ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी काही संवेदनशील मतदारसंघांवर निरीक्षक नियुक्त करण्यात आले होते. खंडित झालेली ही प्रथा लोकसभेच्या या निवडणुकीत पुन्हा सुरू करण्यात आली. पहिल्यांदाच बिहारमधील हरलाखी विधानसभा मतदारसंघातील बिलोना या एकाच मतदान केंद्रावर झालेल्या गैरप्रकारांमुळे तीनदा मतदान घेण्यात आले होते. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी एकूण ३६.३९ कोटी मतदारांनी मतदान केले. त्यामध्ये १७ कोटींहून अधिक महिला होत्या. ५४३ पैकी ७९ जागा या अनुसूचित जातींसाठी, तर ४० जागा या अनुसूचित जमातींसाठी राखीव होत्या. एकूण ४,६३४ उमेदवार या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात होते, त्यापैकी १४२ महिला होत्या.

९ जानेवारी १९८० रोजी या निवडणुकीचा निकाल घोषित करण्यात आला. इंदिरा गांधींच्या काँग्रेस (आय) ने ३५३ जागांवर विजय मिळवला होता. आणीबाणीनंतर घटलेली लोकप्रियता पुन्हा मिळवण्यात इंदिरा गांधींना यश आले आणि त्यांनी जवळपास दोन-तृतीयांश बहुमत प्राप्त केले. चौधरी चरण सिंह यांच्या लोक दल पक्षाला ४२, तर चंद्रशेखर यांच्या जनता पक्षाला ३१ जागा मिळाल्या. माकपने ३७, भाकपने १०, तर काँग्रेस (यू) ने फक्त १३ जागा जिंकल्या.

इंदिरा गांधींनी उत्तर प्रदेशमधील रायबरेली आणि आंध्र प्रदेशमधील मेडक (सध्या तेलंगणा राज्यात) या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. दोन्ही मतदारसंघात विजय मिळवलेल्या इंदिरा गांधींनी मेडक मतदारसंघ राखला. संजय गांधी अमेठीतून, कमल नाथ छिंदवाडातून, शंकर दयाल शर्मा भोपाळमधून, व्ही. पी. सिंग अलाहाबदमधून, तर झैलसिंग होशियारपूरमधून जिंकले. जॉर्ज फर्नांडिस यांनी जनता पार्टी (सेक्यूलर) कडून तिहार तुरुंगातून मुझफ्फरपूर मतदारसंघातील निवडणूक लढवून ती जिंकली होती; तर हरियाणातील सोनीपतमधून देवीलाल विजयी झाले होते.

जनता पार्टीमधील फूट आणि भाजपाचा जन्म

निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्यानंतर २५ फेब्रुवारी १९८० रोजी जगजीवन राम यांनी चंद्रशेखर यांना पत्र लिहिले. भारतीय जनसंघातून जनता पार्टीमध्ये आलेल्या मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य असलेल्या नेत्यांच्या ‘दुहेरी सदस्यत्वा’वर चर्चा करण्यासाठी त्यांनी हे पत्र लिहिले होते. असे दुहेरी सदस्य असणाऱ्या लालकृष्ण आडवाणी यांनी आपल्या आत्मचरित्रामध्ये लिहिले आहे की, भारतीय जनसंघाच्या सदस्यांना जनता पार्टीमध्ये अस्पृश्यांसारखी वागणूक दिली जात होती. त्यामुळे, ६ एप्रिल १९८० रोजी, भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी एकत्र येत वाजपेयी यांना आपला नेता घोषित केले आणि जनता पार्टीच्या चिन्हावर दावा केला.

२४ एप्रिल १९८० रोजी निवडणूक आयोगाने ‘चक्र आणि त्यामध्ये नांगर घेऊन उभा असलेला शेतकरी’ हे चिन्ह गोठवून टाकले. त्यांनी वाजपेयी यांच्या गटाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला. जनता पार्टीचा हाच गट आता ‘भारतीय जनता पार्टी’ या नावाने ओळखळा जाऊ लागला. निवडणूक आयोगाने त्यांना ‘कमळ’ हे चिन्ह देऊ केले. चंद्रशेखर यांच्या गटाला जनता पार्टी (जेपी) हेच नाव ठेवण्याची परवानगी दिली; मात्र त्यांना ‘छत्री’ हे नवे चिन्ह दिले.

हेही वाचा : केजरीवालांवर दहशतवाद्याच्या सुटकेसाठी पैसे घेतल्याचा आरोप; कोण आहे देविंदर भुल्लर?

इंदिरा गांधींची शोकांतिका

सत्तेत परत आल्यावर इंदिरा गांधींनी नऊ गैर-काँग्रेस राज्य सरकारे बरखास्त केली आणि त्यांच्या विधानसभा विसर्जित केल्या. या राज्यांमध्ये मे-जून १९८० मध्ये निवडणुका झाल्या. या निवडणुकीनंतर बहुतांश ठिकाणी काँग्रेसची सत्ता आली. २३ जून १९८० रोजी इंदिरा गांधींचे ३३ वर्षीय राजकीय वारसदार संजय गांधी यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. इंदिरा गांधी अतीव दु:खात होत्या; पण येणारी वर्षे त्यांना अधिक अडचणीत आणणारी ठरणार होती. संजय गांधी यांच्या जागी अमेठी मतदारसंघातून त्यांचे मोठे भाऊ राजीव गांधी यांनी निवडणूक लढवली. राजीव गांधी राजकारणात येण्यास इच्छुक नव्हते, मात्र त्यांना ही जबाबदारी पार पाडावी लागली.

यानंतर पंजाबमधील फुटीरतावादी चळवळीने वेग घेतला आणि हेच इंदिरा गांधींसमोरील सर्वांत मोठे आव्हान ठरले. इंदिरा गांधींनी जर्नेलसिंग भिंद्रनवाले यांना सुवर्ण मंदिरातून बाहेर काढण्यासाठी १ जून १९८४ रोजी ऑपरेशन ब्लू स्टार सुरू केले. ३ जून रोजी पंजाबमध्ये ३६ तासांचा कर्फ्यू लागू करण्यात आला. यामध्ये सर्व दळणवळण, सार्वजनिक प्रवास आणि वीज बंद करण्यात आली. माध्यमांवरही संपूर्ण सेन्सॉरशीप लागू करण्यात आली. भारतीय सैन्याने भिंद्रनवालेला ठार मारले; परंतु या ऑपरेशनमध्ये शिखांच्या सर्वात पवित्र मंदिराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या ऑपरेशनमुळे शिखांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी इंदिरा गांधींची त्यांच्याच दोन शीख अंगरक्षकांनी हत्या केली. त्यामुळे १९८४ रोजी शीखविरोधी दंगलीने पेट घेतला. निरपराध शिखांवर सामूहिक हल्लेही झाले. त्यानंतर राजीव गांधी यांनी वयाच्या ४० व्या वर्षी पंतप्रधानपदाची शपथ घेतली.