विदर्भात गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतीचे मोठे नुकसान केले. हा पाऊस केवळ जलधारांचे बरसणे नव्हते, तर गारांचा मारा होता. कडक उन्हाळा असूनही गारा कशा पडतात, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडणे साहजिकच. त्याविषयी…

उन्हाळ्यात गारा का पडतात?

उन्हाळ्यात इतका उष्मा जाणवत असताना गारांचा पाऊस कसा पडतो, याबाबत भारतीय उष्णदेशीय हवामानविज्ञान संस्था अर्थात ‘आयआयटीएम’चे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी सांगतात, की उन्हा‌ळ्यात सूर्याच्या उष्णतेने जमीन तापून हवा वातावरणात वर जाते. ती सगळीकडे न जाता काही ठिकाणी हवेचे प्रवाह वर जातात. वर जाताना हवा थंड होते. हवा थंड होण्याची प्रक्रिया सुरू असताना, त्याच वेळेस हवेत आर्द्रता असेल, तर हवेचे संक्षेपण होऊन ढगांची निर्मिती होते. ही आर्द्रता येते कुठून? जमीन तर कोरडी असल्याने त्यात आर्द्रता नसतेच. ही आर्द्रता अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरावरून येते. दुसरीकडे, हवा जसजशी वातावरणाच्या वरच्या थरात जाते, तसतसे तिचे तापमान कमी होते. साधारण ५ किलोमीटरच्या वर तापमान शून्य अंश सेल्सियस होते. आता आर्द्रतेमुळे संक्षेपण झालेल्या हवेचे प्रवाह या अंतराच्या वर गेले, तर आतील आर्द्रतेचे रूपांतर बर्फात होते. त्यालाच आपण गारा म्हणतो. मार्च-एप्रिल-मे या महिन्यांत ही प्रक्रिया काही वेळा घडत असल्याने या महिन्यांत गारपीट होते. गुजरात ते ओडिशापर्यंतच्या पट्ट्यात, ज्यात विदर्भाचा भाग येतो, तापमान जास्त असते आणि येथे बाष्पही मिळते. त्यामुळे या भागांत गारपिटीचे प्रकार अधिक होतात.

हेही वाचा : Right to Sleep : भारतात झोप हा खरंच मूलभूत अधिकार आहे का?

गारा ज्यातून पडतात, ते ढग वेगळे असतात का?

गारा ज्या ढगांतून कोसळतात, ते उंच वाढणारे ढग असतात. त्याला क्युमुलोनिम्बस म्हणतात. ते काळेकुट्ट असतात, कारण त्यात खालून माती जाते, सूर्यप्रकाश अडवला जातो. त्याबरोबर सोसाट्याचा वाराही सुटतो. असे ढग सर्वसाधारणपणे मान्सूनपूर्व काळातच तयार होतात. आणखी एक म्हणजे, हवेचे प्रवाह जितके वर, म्हणजे अर्थात गोठणबिंदूखालच्या तापमानात जातात, तितके ते अधिक आर्द्रताही शोषतात. त्यामुळे गारांचा आकार वाढतो. खाली येताना उष्णतेशी संपर्क झाला, तर त्या वितळतात. त्यामुळे अनेकदा खाली पडताना गारांचा आकार कमी होतो. काही वेळा तर गारा पूर्णपणे वितळून केवळ पाण्याचे मोठे थेंब पडतात.

गारपीट आणि हिमवर्षाव यांच्यात फरक काय?

काश्मिरात होणारा हिमवर्षाव आणि गारपीट हे एकसारखे नसते. काश्मिरात किंवा अन्य थंड प्रदेशांत पडणारे हिम भुसभुशीत असते, तर गारा टणक असतात. दोन्हींची निर्मिती वेगवेगळ्या प्रकारांनी होत असल्याने त्यांच्यात फरक असतो. हिमवर्षाव हिवाळ्यात होतो, तर गारा उन्हाळ्यात पडतात.

हेही वाचा : विश्लेषण: ‘फॉरएव्हर पार्टिकल्स’ प्रदूषण म्हणजे काय? अमेरिका त्यांचे नियमन का करत आहे?

पावसाळ्यात गारा का पडत नाहीत?

पावसाळ्यात ढग निर्माण होण्याची प्रक्रिया वेगळी असते. महाराष्ट्रापुरते बोलायचे, तर अरबी समुद्रातून बाष्प निघते, ते सह्याद्रीच्या डोंगररागांना धडकून आपोआप वर ढकलले जाते. त्यामुळे वाफेचे जलबिंदूंत रूपांतर होऊन ढग निर्माण होतात. ते पसरट वाढणारे ढग असतात, उंच वाढणारे किंवा क्युमुलोनिम्बस ढग नसतात. त्यामुळे पाऊसही संततधार स्वरूपाचा असतो. वादळी वाऱ्यासह वेडावाकडा कोसळणारा नसतो.

गारपिटीचे धोके काय?

गारपीट होताना विजाही जास्त चमकतात. गारांच्या घर्षणामुळे विद्युतकण विलग होतात व घन आणि ऋण भार तयार होतात. हा भार क्षमतेपेक्षा वाढला, तर हवेतच विरतो, ज्याला आपण वीज म्हणतो. जेव्हा हा प्रवाह हवेतून जातो, तेव्हा तो जोरात असतो, त्यामुळे आपल्याला प्रकाश दिसतो. अशा प्रकारे गारा, जोराचा वारा, विजा हे सत्र मान्सूनपूर्व काळात घडते. यामुळे आंब्याचा मोहोर जळणे, पिकांचे नुकसान अशी हानी होते. वीज कोसळणेही धोकादायकच. वीज कोसळताना जमिनीत जाण्यासाठी जागा शोधत असते. त्यासाठी झाड हे चांगले साधन असते. म्हणून अनेकदा झाडावर वीज पडते, मोकळ्या शिवारात पडत नाही. त्यामुळे झाडाखाली आसऱ्याला आलेल्यांचा मृत्यू होण्याचा संभव असतो.

हेही वाचा : Ram Navami 2024: ‘या’ मुघल सम्राटाच्या आईला प्रिय होते रामायण? कोण होता हा सम्राट?

गारपिटीचा अंदाज देता येतो का?

गारपीट होऊ शकेल, अशा प्रकारचे निर्माण झालेले ढग तयार होताना रडारवर दिसतात, पण त्यांचा जीवनकाल काही तासांचा असल्याने खूप आधी पूर्वसूचना देता येत नाही. त्यांची निर्मिती जेमतेम तासभर आधी कळू शकते.