सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण भारतभरातच नामांतराचे वारे वाहत आहेत. राहुल गांधींच्या वायनाड मतदारसंघातील सुलतान बथेरी हे शहर नामांतराच्या बाबतीत चर्चेत आहे. केरळच्या वायनाड जिल्ह्यातील सुलतान बथेरीचे नाव बदलणे “अपरिहार्य” असल्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन यांनी म्हटले आहे. के. सुरेंद्रन यांना वायनाड लोकसभा मतदारसंघासाठी भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अधिक वाचा: विश्लेषण: अलिबागमधील ‘अली’ कोण होता? मुस्लीम की बेने इस्रायली?

के. सुरेंद्रन नेमके काय म्हणाले?

सुलतान बथेरीचे नाव बदलणे अपरिहार्य आहे. सुलतान बथेरी हे नाव [टिपू सुलतानच्या] या भागावर झालेल्या आक्रमणानंतर या जागेला मिळाले आहे. सुलतान बथेरीचे नाव बदलून गणपत्यवट्टम ठेवावे. ही टिपू सुलतानची भूमी नाही. टिपू सुलतानने हिंदू आणि ख्रिश्चनांची कत्तल केली… काँग्रेस आणि सीपीएमला हे ठिकाण एखाद्या गुन्हेगाराच्या (टिपूच्या) नावाने ओळखले जावे असे वाटत आहे, असे सुरेंद्रन म्हणाले. सुरेंद्रन हे या लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार राहुल गांधी (काँग्रेस) आणि ॲनी राजा (सीपीआय) यांच्या विरोधात लढत आहेत.

शहराचा इतिहास आणि त्यांची नावे काय आहेत? गणपत्यवट्टम हे नाव कोठून आले?

सुलतान बथेरी (इतर दोन मनंथवाडी आणि कल्पेट्टा) हे वायनाडमधील तीन नगरपालिका शहरांपैकी एक आहे. येथे एक दगडात बांधलेले प्राचीन मंदिर आहे, हे दगडी मंदिर एकेकाळी गणपतीवट्टम म्हणून ओळखले जात होते. या मंदिराचे बांधकाम विजयनगर राजघराण्याच्या प्रचलित स्थापत्य शैलीत आहे. मंदिर इसवी सन १३ व्या शतकात सध्याच्या तामिळनाडू आणि कर्नाटकमधील भागातून वायनाड येथे स्थलांतरित झालेल्या जैनांनी बांधले. १८ व्या शतकाच्या उत्तरार्धात म्हैसूरचा शासक टिपू सुलतान याच्या आक्रमणात मंदिराला अंशतः झळ पोहोचली. १७५० ते १७९० या कालखंडादरम्यान,आजच्या उत्तर केरळवर म्हैसूरच्या शासक, हैदर अली आणि त्याचा मुलगा टिपू यांनी अनेक वेळा आक्रमण केले. त्यातही अनेकदा या मंदिराला क्षती पोहचली. सुमारे दीडशे वर्षे हे मंदिर त्याच अवस्थेत होते. या मंदिराचा ताबा भारतीय पुरातत्त्व खात्याकडे आल्यावर या स्मारकाला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात आले.

अधिक वाचा: किंग्ज सर्कल रेल्वे स्थानकाला नाव देण्यात आलेले तीर्थंकर पार्श्वनाथ कोण आहेत?

“सुलतान बथेरी” या शहराचा इतिहास

टिपूच्या सैन्याने या भागातील अनेक मंदिरे आणि चर्च नष्ट केली. अनेकांचे जबरदस्तीने धर्मांतरण केले. त्यामुळे या भागातील बहुसंख्य लोक स्थलांतरित झाले. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार ” असे मानले जाते की या सैन्याने २५ चर्चेस पाडली… चर्चच्या पाडावानंतर, टिपूची नजर पश्चिम कर्नाटकातील रोमन कॅथलिकांच्या लक्षणीय लोकसंख्येवर पडली. पश्चिम कर्नाटकात मोठ्या संख्येने रोमन कॅथलिक स्थायिक झाले होते”. टिपू सुलतानने सुलतान बथेरी येथील महागणपती मंदिराचा वापर मलबार प्रदेशात (वायनाडसह आजचे उत्तर केरळ) त्याच्या सैन्यासाठी शस्त्रास्त्रांसाठी बॅटरी (शस्त्रागार) म्हणून केला. यामुळे ब्रिटीशांनी गणपत्यवट्टमची नोंद “[टिपू] सुलतानची बॅटरी” म्हणून केली आणि नंतरही हे नाव सुलतान बॅथरी/बथेरी म्हणून टिकून राहिले. आता मात्र भाजपाने हा निवडणुकीचा मुद्दा केला असून सत्ता मिळाल्यास नाामंतर करण्याचे आश्वासन, दिले आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What exactly does the history of sultan bathery that bjp wants to change its name svs
First published on: 12-04-2024 at 08:01 IST