किंग्ज सर्कल या हार्बर मार्गावरील रेल्वे स्थानकाचे नाव बदलून तीर्थंकर पार्श्वनाथ करण्यासह मुंबईतील इतर सात उपनगरीय रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याची मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी राज्य सरकारकडे केली होती. तसेच राज्य सरकारकडून या मागणीस मान्यता देण्यात आली आहे. या यादीत करी रोडचे लालबाग, सँडहर्स्ट रोडचे डोंगरी, मरीन लाईन्सचे मुंबादेवी, चर्नी रोडचे गिरगाव, कॉटन ग्रीनचे काळाचौकी, डॉकयार्डचे माझगाव आणि किंग्ज सर्कलचे तीर्थंकर पार्श्वनाथ इत्यादींचा समावेश आहे. शेवाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री शिंदे यांनी हा प्रस्ताव स्वीकारला आहे. विशेष म्हणजे या सात उपनगरीय स्थानकांमध्ये एकाच स्थानकाला- किंग्ज सर्कलला धर्मगुरूंचे नाव देण्यात येणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर किंग्ज सर्कलला देण्यात येणाऱ्या तीर्थंकर पार्श्वनाथ नावाविषयी अधिक जाणून घेणे समयोचित ठरणारे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जैन तत्त्वज्ञान हे नास्तिक दर्शनातील एक महत्त्वाचे दर्शन आहे. जैन हे वेद-वर्णाश्रम व्यवस्था मान्य करत नाहीत, ते समानतेवर विश्वास ठेवतात. विष्णू आणि भागवत पुराणात नमूद केल्याप्रमाणे ऋषभनाथ हे जैनांचे पहिले तीर्थंकर होय. यजुर्वेदामध्ये ऋषभ, अजित, अरिष्टनेमि अशा आद्य जैन तीर्थंकरांचा उल्लेख आढळतो. जैन मान्यतेनुसार नेमिनाथ हे २२ वे तीर्थंकर होते, जे भगवान श्री कृष्णाच्या समकालीन होते. किंबहुना नेमिनाथ ही यादवकुलीन होते असे मानले जाते. जैन संप्रदाय हा त्यांच्या २३ व्या तीर्थंकरांच्या कालखंडात प्रभावशाली ठरला.

अधिक वाचा: Jain Pilgrimage Centre: दक्षिण कोकणातील प्राचीन जैन तीर्थ !

कोण होते तीर्थंकर पार्श्वनाथ?

भारतीय संस्कृतीत वैदिक आणि बौद्ध परंपरेबरोबरीनेच ज्या परंपरेने आपली आमूलाग्र छाप सोडली आहे, ती म्हणजे जैन परंपरा. जैन धर्मात २४ तीर्थंकर पूज्य मानले जातात.जैन परंपरेच्या मान्यतेनुसार ही जैन परंपरा ही वैदिक परंपरेइतकीच प्राचीन आहे. इसवी सनपूर्व सहावे शतक हे जैन परंपरेत महत्त्वाचे मानले जाते. हा कालखंड भगवान महावीरांसाठी ओळखला जातो. महावीर हे जैन संप्रदायातील २४ वे तीर्थंकर आहेत. त्यापूर्वीच्या २३ तीर्थंकरांविषयी आपल्याला क्वचितच माहीत असते. याच यादीतील २३ वे तीर्थंकर म्हणजे पार्श्वनाथ. पार्श्वनाथांचा जन्म काशी नगरीत राणी वामादेवी आणि राजा अश्वसेन यांच्या पोटी झाला. दिगंबर पुराणानुसार राजा अश्वसेन आणि राणी ब्रह्मादेवी अशी पार्श्वनाथांच्या माता-पित्यांची नावं आहेत. काही पुराणात पार्श्वनाथांच्या आईचे नाव ब्रह्मील्ला किंवा ब्रह्म्मदत्ती असे आढळते. मूलतः महावीर वगळता इतर जैन तीर्थंकर आणि त्यांची ऐतिहासिकता हा नेहमीच अभ्यासकांमधील मतभिन्नतेचा विषय ठरला आहे. पार्श्वनाथांच्या बाबतीतही कमी अधिक फरकाने हे आढळून येते. बहुतांश अभ्यासक पार्श्वनाथ हे ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व असल्याचे मान्य करतात. तत्कालीन जैन आणि बौद्ध साहित्यातील त्यांचे उल्लेख त्यांची प्राचीनता सिद्ध करणारे आहेत. पॉल डुंडास, हरमन जेकोबी (Paul Dundas, Hermann Jacobi) आपल्या संशोधनात पार्श्वनाथांची ऐतिहासिकता सिद्ध करणारे पुरावे सादर करतात. ऐतिहासिक संदर्भानुसार पार्श्वनाथ हे इसवी सनपूर्व आठव्या शतकात होऊन गेले असे मानले जाते. पार्श्वनाथ हे महावीरांच्या २७३ वर्ष आधी होऊन गेल्याचे अभ्यासक मानतात. प्रत्यक्ष पुरातत्त्वीय उत्खननात सापडलेल्या पार्श्वनाथांच्या प्राचीन मूर्ती या इसवी सनपूर्व दुसऱ्या शतकातील आहेत.

पार्श्वनाथांचा जन्म

साहित्यिक संदर्भानुसार पार्श्वनाथ हे इक्ष्वाकू वंशातील होते. जैन पौराणिक साहित्यानुसार पार्श्वनाथांनी आधीच्या जन्मात १३ व्या स्वर्गात इंद्र म्हणून राज्य केले. पार्श्वनाथ त्यांच्या आईच्या गर्भात असताना त्यांच्यावर देवांनी गर्भ कल्याण केले असा संदर्भ सापडतो. त्यावेळी त्यांच्या आईला १६ शुभ स्वप्ने पडली होती. जैन ग्रंथानुसार ज्यावेळी पार्श्वनाथांचा जन्म झाला त्यावेळी इंद्राचे सिंहासन डळमळीत झाले, हा इंद्र जन्माचा संकेत होता. पार्श्वनाथांचा जन्म झाला त्यावेळी त्यांच्या त्वचेचा रंग काळा-निळा होता. पार्श्वनाथांच्या जन्मापूर्वी त्यांच्या आईला एक काळा साप पलंगाच्या बाजूला रेंगाळताना दिसला. म्हणून त्यांनी जन्माला आलेल्या बाळाचे नाव पार्श्वनाथ ठेवले. लहानपणापासूनच राजपुत्राला सापांबद्दल विशेष आकर्षण होते. पार्श्वनाथ तारुण्यात एक निर्भय योद्धा म्हणून प्रसिद्ध पावले. त्यांनी वयाच्या १२व्या वर्षांपासूनच प्रौढ जैन गृहस्थाच्या बारा मूलभूत कर्तव्यांचे अनुसरण करण्यास सुरुवात केली होती असे काही जैन ग्रंथ संदर्भ देतात.

अयोद्धेच्या प्रभावतीशी विवाह

प्रचलित संदर्भानुसार पार्श्वनाथांचा विवाह अयोध्येचा राजा प्रसेनजीत याची कन्या प्रभावती हिच्याशी झाला होता. परंतु दिगंबर पंथानुसार पार्श्वनाथांनी कधीही लग्न केले नाही. एका जैन ग्रंथात नमूद केल्याप्रमाणे सोळा वर्षीय पार्श्वनाथाने आपल्या वडिलांच्या इच्छेनुसार लग्न करण्यास नकार दिला होता. तर दुसऱ्या एका कथेनुसार अयोध्येचा राजा प्रसेनजीत याने पार्श्वनाथांच्या कर्तृत्वाविषयी ऐकून त्यांना आपली कन्या पद्मावती हिच्याशी विवाह करण्याची विनंती केली. याच दरम्यान, कलिंगच्या यवन राजाने, राजकन्येच्या सौंदर्याविषयी ऐकून तिची अभिलाषा धरली आणि प्रसेनजिताच्या राजधानीकडे कूच केली. हे पार्श्वनाथांना कळताच त्यांनी राजकन्येच्या संरक्षणार्थ धाव घेतली आणि यवन राजाचा पराभव केला. त्यानंतर पार्श्वनाथ आणि राजकन्येचा विवाह संपन्न झाला.

अधिक वाचा: शत्रूच्या कवट्या गोळा करणाऱ्या राजाचे मतपरिवर्तन कसे झाले? काय होते मध्ययुगीन जैन धर्माचे स्वरूप?

गृहत्याग आणि ज्ञानप्राप्ती

वयाच्या ३० व्या वर्षी, पौष महिन्यात पार्श्वनाथांनी गृहत्याग केला. वाराणसीजवळील धाटकीच्या झाडाखाली त्यांना केवलज्ञान प्राप्त झाले, त्यापूर्वी त्यांनी ८४ दिवस ध्यान केले. या ८४ दिवसांच्या कालखंडात त्यांनी कठोर तपस्या आणि वेगवेगळ्या व्रतांचे पालन केले. जैन धर्मग्रंथानुसार त्यांच्या आजूबाजूला एकाच वेळी सिंह आणि हरणाचे पाडस खेळत असायचे. पार्श्वनाथांना अहिच्छत्र येते केवलज्ञान प्राप्त झाले. विविधतीर्थ कल्पानुसार पार्श्वनाथांना केवलज्ञान प्राप्त करण्यापासून रोखण्यासाठी कमठाने सतत पाऊस पाडला होता. त्यावेळी धरणेंद्र नागाने पार्श्वनाथांच्या डोक्यावर फणा धरला आणि त्यांचे रक्षण केले. चैत्र महिन्यात १४ व्या दिवशी पार्श्वनाथांना सर्वज्ञान प्राप्त झाले.
पार्श्वनाथ या तीर्थंकरांचे चिन्ह सप्तफणाधारी नाग असून त्यांच्या मूर्तीच्या मस्तिष्कावर तो कोरलेला असतो. केवलज्ञानप्राप्तीनंतर पार्श्वनाथांनी धर्माचा उपदेश केला व अनुयायांनी संघटना उभारली. साधू, साध्वी, श्रावक व श्राविका असा चतुर्विध संघ त्यांच्या अनुयायीवर्गात होता. पार्श्वनाथांना वयाच्या १०० व्या वर्षी सम्मेतशिखरावर मोक्ष प्राप्ती झाली, त्यामुळे या शिखराला पारसनाथ टेकडी असे म्हटले जाते. पार्श्वनाथांनी अहिंसा, सत्य, अचौर्य व अपरिग्रह ही चार व्रते प्रतिपादन करणारा ‘चातुर्याम धर्म’ शिकविला, या चार व्रतांना ‘चातुर्यामसंवर’ असे म्हटले जाते. महावीरांच्या कालखंडात पार्श्वनाथाच्या चार व्रतांमध्ये ब्रह्मचर्यव्रताची भर घातली. या पाच व्रतांना ‘पंचयामिक धर्म’ संबोधले जाते.

पार्श्वनाथांची शिकवण

पार्श्वनाथ यांनी ऐहिक जीवनाचा त्याग करून तपस्वी समाजाची स्थापना केली. जैन धर्मात आढळणाऱ्या श्वेतांबर आणि दिगंबर या पंथांमधील भिन्नतेनुसार पार्श्वनाथ आणि महावीर यांच्या शिकवणुकीतही भिन्नता आढळते. दिगंबरांच्या मान्यतेनुसार या दोन्ही तीर्थंकरांच्या शिकवणुकीत फारशी तफावत नव्हती. परंतु श्वेतांबर यांच्यानुसार महावीरांनी पार्श्वनाथांच्या व्रतांचा विस्तार केला, ब्रह्मचर्य हे व्रत जोडले. तसेच श्वेतांबरांच्या मतानुसार पार्श्वनाथांच्या लेखी ब्रह्मचर्य फारसे महत्त्वाचे नव्हते. मुनींना बाह्य काढं कपडे घालण्याची परवानगी होती. यांशिवाय प्रतिक्रमण म्हणजे स्वपापांची कबुली व प्रायश्चित्त घेणे, नग्नव्रत, संन्यास व तप या गोष्टींवर महावीरांनी विशेष भर दिला. आचाररंग सूत्रात नमूद केल्याप्रमाणे महावीरांचे पालक हे पार्श्वनाथांचे अनुयायी होते

सध्या मुंबईतही भगवान पार्श्वनाथांना मानणारा जैन समाज मोठ्या प्रमाणावर असून, त्यांचे नाव किंग्ज सर्कलला देण्याच्या निर्णयाचे समाजाने स्वागत केले आहे!

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who is tirthankar parswanath after whom kings circle station is named svs
First published on: 13-03-2024 at 23:46 IST