भारतीय कृषी संशोधन संस्थेनं (IARI) अलीकडेच कालानमक तांदळाच्या दोन नवीन वाणांची चाचणी घेतली आहे. यामध्ये दुप्पट उत्पादन मिळाल्याचे निष्कर्ष समोर आले आहेत. पुसा नरेंद्र कालानमक १६३८ आणि पुसा नरेंद्र कालानमक १६५२ असं या दोन वाणांची नावं आहेत. कालानमक तांदूळ म्हणजे काय? कालानमक हे भाताचं पारंपरिक वाण मानलं जातं. याचा रंग काळा असतो. तसेच याला एक वेगळा गंध असतो. गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर त्यांनी उत्तर प्रदेशातील सरावस्ती या ठिकाणाला भेट दिली. तेव्हापासून तेथील लोकांसाठी कालानमक तांदूळ हे "भगवान बुद्धांची दिलेली भेट" म्हणून ओळखली जाते. हे पीक नेपाळ आणि उत्तर प्रदेशच्या ईशान्येकडील तराई प्रदेशातील ११ जिल्ह्यांमध्ये घेतलं जातं. अशा प्रकारच्या भात उत्पादनामुळे उत्तर प्रदेशच्या तराई पट्ट्यातील सिद्धार्थनगर जिल्ह्याला "एक जिल्हा, एक उत्पादन" या योजनेअंतर्गत पुरस्कार देण्यात आला आहे. शिवाय कालानमक तांदळाला जिओग्राफिकल इंडिकेशन (GI) टॅगदेखील प्रदान करण्यात आला आहे. तसेच संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेने (एफएओ) "स्पेशॅलिटी राइस ऑफ द वर्ल्ड" या पुस्तकात या कालानमक तांदळाच्या वैशिष्ट्यांची सविस्तर माहिती दिली आहे. कालानमक तांदूळ उत्पादनातील अडचणी कालानमक जातीचा तांदळाच्या पिकाची उंची अधिक असते. तसेच या पिकाला दुप्पट दाणे लागतात. पिकाच्या वरच्या बाजुला जास्त धान्य लागल्याने हे पीक जमिनीच्या दिशेनं झुकलं जातं. बहुतांशीवेळा हे पीक भुईसपाट होण्याचा धोका जास्त असतो. परिणामी पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं. शिवाय, भात पिकावर विविध प्रकारच्या रोगाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका असतो. कारण कालानमक तांदूळ हे पीक बहुतेक वेळा खतं किंवा कीटकनाशकांच्या वापर न करता घेतलं जातं. मात्र, कीटकनाशकं आणि खतांचा वापर केला जात नसल्याने शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात पैशांची बचत होते. कालानमक तांदळाची आरोग्यासाठी उपयुक्तता कालानमक या तांदळात लोह आणि झिंक यासारख्या सूक्ष्म पोषक घटकांचं प्रमाण अधिक असतं. हे घटक अल्झायमरसारख्या आजारांवर प्रतिबंधक ठरतात. यात ११ टक्के प्रथिनेदेखील असतात, हे प्रमाण इतर तांदळाच्या जातींपेक्षा जवळजवळ दुप्पट आहेत. या तांदळाचा ग्लायसेमिक इंडेक्स (४९ ते ५२ टक्के) कमी असल्याने हा तांदूळ मधुमेहासाठी फायदेशीर ठरतो. तसेच कालानमक तांदळात अँथोसायनिनसारखे अँटिऑक्सिडंट्स असतात, यामुळे त्वचेचं आरोग्य सुधारतं आणि हृदयरोगापासून बचाव होतो. याशिवाय हे तांदूळ रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी आणि रक्ताशी संबंधित समस्या टाळण्यासाठीदेखील उपयुक्त असल्याचे आढळून आलं आहे.