मुंबईत यंदा मार्च महिन्यापासूनच पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागणार आहेत. महापालिका प्रशासनाने राज्य सरकारकडे भातसा आणि ऊर्ध्व वैतरणा धरणातील राखीव साठा मिळावा अशी मागणी केली आहे. मात्र ती मागणी अद्याप मान्य न झाल्यामुळे पाणीकपातीची टांगती तलवार मुंबईकरांवर आहे. 

यावर्षी पाणीकपातीची वेळ का?

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांत सध्या पन्नास टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा शिल्लक आहे. जूनपासून पावसाळा सुरू होत असला तरी प्रत्यक्षात मोठा पाऊस पडण्यास जुलै महिना उजाडतो. हा पाणीसाठा जुलै महिन्यापर्यंत पुरवावा लागणार आहे. त्यामुळे पाणीकपातीची वेळ आली आहे. 

हेही वाचा >>>विश्लेषण: ‘बैजूज’मधून रवींद्रन यांची हकालपट्टी होईल का?

मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणे किती?

मुंबई शहराला तानसा, मोडक सागर (वैतरणा), हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा, ऊर्ध्व वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या धरणांतून पाणीपुरवठा केला जातो. तुळशी, विहार, तानसा, मोडकसागर, मध्य वैतरणा ही पाच धरणे मुंबई महानगरपालिकेच्या मालकीची आहेत. तर भातसा आणि अप्पर वैतरणा ही दोन धरणे राज्य सरकारच्या मालकीची आहेत. ही दोन धरणे बांधताना केलेल्या भांडवली खर्चाच्या सहभागामुळे पालिकेला या धरणातून पाणी मिळते.

राखीव साठ्याची मागणी का?

धरणातील पाणीसाठा पन्नास टक्क्यांवर आला की पालिका प्रशासन राज्य सरकारकडे राखीव साठ्याची मागणी करणारे पत्र पाठवत असते. साधारणतः मे महिन्यात अशी वेळ येते. यंदा मात्र ही वेळ मार्च महिन्यातच आली आहे.

हेही वाचा >>>नव्या FPI फसवणुकीबाबत सेबीकडून गुंतवणूकदारांना सावधानतेचा इशारा; नेमकी फसवणूक कशी करतात?

पाणीकपात का करावी लागते? 

दुरुस्तीच्या कामासाठी कधीतरी तात्पुरती पाणीकपात केली जाते. मात्र उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढते त्यावेळी पाणीसाठा खालावलेला असल्यावर काही महिने किंवा पुरेसा पाऊस पडेपर्यंत पाणीकपात करावी लागते. पावसाळ्याचे चार महिने संपले की ऑक्टोबर महिन्यात पाणीसाठ्याचा आढावा घेतला जातो. या वेळी धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली असतील तर पाणीकपातीची आवश्यकता नसते. मात्र थोडी तूट राहिली तर पाणीकपात करावी लागते. २०१८ मध्ये पाणीसाठ्यात ९ टक्के तूट राहिल्यामुळे वर्षभर १० टक्के पाणीकपात करण्यात आली होती. गेल्या वर्षी जून महिन्यात पावसाने ओढ दिल्यामुळे पालिका प्रशासनाने १ जुलैपासून १० टक्के पाणीकपात लागू केली होती. मात्र जुलै महिन्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांपैकी चार धरणे ओसंडून वाहू लागली व ऑगस्टमध्ये ही पाणीकपात मागे घेतली गेली.

मुंबईला पाणीपुरवठा करणारे जलाशय कुठे आहेत?

मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणे मुंबई शहरापासून सुमारे १०० किलोमीटर वा त्यापेक्षा जास्त अंतरावर आहेत. तानसा, मोडक सागर, मध्य वैतरणा ही धरणे पालघर जिल्ह्यात आहेत. भातसा हे धरण शहापूर तालुक्यात आहे. तर ऊर्ध्व वैतरणा हे धरण नाशिक जिल्ह्यात इगतपुरी येथे आहे. मुंबई शहराच्या हद्दीत केवळ विहार आणि तुळशी हे दोन तलाव आहेत. मुंबई शहरात पवई तलाव असून  त्यातील पाण्याचा वापर पिण्यासाठी केला जात नाही. 

हेही वाचा >>>हरियाणामध्ये गोळ्या झाडून हत्या झाली ते आयएनएलडी प्रदेशाध्यक्ष नफेसिंह राठी कोण होते?

धरणांची साठवण क्षमता किती?

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ धरणांची एकूण कमाल पाणी साठवण क्षमता ही सुमारे १,४४,७३६.३ कोटी लीटर (१४,४७,३६३ दशलक्ष लीटर) इतकी आहे. तुळशी तलाव हा सर्वात लहान तलाव असून त्याची कमाल पाणी साठवण क्षमता ही ८०४.६० कोटी लीटर (८,०४६ दशलक्ष लीटर) इतकी आहे. तानसा तलावाची क्षमता १४,४९४.६ कोटी लीटर (१४४,९४६ दशलक्ष लीटर) आहे. विहार तलावाची कमाल जलधारण क्षमता ही २,७६९.८ कोटी लीटर (२७,६९८ दशलक्ष लीटर) एवढी आहे. मोडक सागर तलावाची कमाल पाणी साठवण क्षमता १२,८९२.५ कोटी लीटर (१,२८,९२५ दशलक्ष लीटर) इतकी आहे. मध्य वैतरणा धरणाची पाणी साठवण क्षमता १,९३,५३० दशलक्ष लीटर इतकी आहे. ऊर्ध्व वैतरणा धरणाची साठवण क्षमता २,२७,०४७ दशलक्ष लीटर इतकी आहे. भातसा हे धरण सर्वात मोठे असून त्याची साठवण क्षमता एकूण पाणी साठ्याच्या निम्मी म्हणजेच तब्बल ७,१७,०३७ दशलक्ष लीटर इतकी आहे. 

कोणत्या धरणातून किती पाणीपुरवठा होतो?

मुंबई शहराला या सर्व जलस्रोतातून ३८५० दशलक्ष लिटर प्रतिदिन इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. तानसा धरणातून दरदिवशी ४५५ द.ल.लि. प्रतिदिन पाणीपुरवठा केला जातो. तर  मोडक सागर (वैतरणा) (४५५ द.ल.लि. प्रतिदिन), हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा (४५५ द.ल.लि. प्रतिदिन), ऊर्ध्व वैतरणा (६४० द.ल.लि. प्रतिदिन) आणि भातसा धरणातून सर्वात जास्त (२०२० द.ल.लि. प्रतिदिन) पाणीपुरवठा करण्यात येतो. मुंबई शहराच्या हद्दीतील दोन लहान तलावांपैकी विहार तलावातून ९० द.ल.लि. प्रतिदिन आणि तुळशी तलावातून १८ द.ल.लि. प्रतिदिन पाणीपुरवठा केला जातो.

यंदा पाणीसाठा का खालवला?

यंदा मोसमी पाऊस लवकर परतला. ऑक्टोबर महिनात दरवर्षी पाऊस पडतो पण तो यंदा पडला नाही. त्यामुळे धरणे कठोकाठ भरली तरी  पाणीसाठा खालावत गेला असे प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र मोठ्या प्रमाणावर होणारी पाणी गळती, जलवाहिन्या फुटल्यामुळे होणारा पाण्याचा अपव्यय आणि उष्णता प्रचंड वाढल्यामुळे पाण्याची होणारी वाफ यामुळे पाणीसाठा वेगाने खालावतो आहे.

पाणीकपात झाल्यास काय होईल?

पाणीकपात झाल्यास मुंबईकरांना नेहमीपेक्षा कमी वेळ किंवा कमी दाबाने पाणी मिळेल. त्यामुळे भूभागाच्या अगदी टोकावर राहणाऱ्या वसाहतींना तसेच उंच टेकडीवरील वसाहतींना मोठ्या पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. त्याचबरोबर मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या भिवंडी आणि ठाण्यातील ज्या गावातून जातात त्यांना दिल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्यातही कपात होईल.