चाळीस वर्षांच्या गृहिणी असलेल्या अनुयाने गेल्या दहा वर्षांत १२ वेळा घर बदलले. अनुया घराबाहेर पडली की तिचे शेजारी एकमेकांना इशारे करून तिची खिल्ली उडवायचे. सतत तिच्या स्वयंपाकाची चर्चा करायचे, तिला नावे ठेवायचे. एवढेच नव्हे, तर तिचे कित्येक दिवसांत पतीशी लैंगिक संपर्क नाही, हेसुद्धा त्यांना कळले. कसे बरे? कारण त्यांनी बहुतेक घरांत कॅमेरे लावून ठेवले असावेत, असे तिला वाटत होते. आता पुन्हा घर बदलायचे होते. भ्रम आणि वागणूक आपल्या पंचेंद्रियांमधून आजूबाजूची माहिती मिळत असते. मात्र काही व्यक्तींना इंद्रियांमध्ये चुकीच्या संवेदना होतात. आवाज ऐकू येणे, कुणी तरी दिसणे, वास येणे, स्पर्श जाणवणे, चव लागणे हे या संवेदनांचे काही प्रकार असतात. वारंवार असे घडल्याने त्या माणसाला हे सर्व खरे वाटू लागते. काही वेळेला एकाएकी माणसाला भ्रम निर्माण होतो. मग प्रत्येक गोष्ट त्या नजरेने बघितली जाते. आपला जोडीदार एकनिष्ठ नाही, हा भ्रम खूपच भयानक असतो. ती व्यक्ती सतत जोडीदाराशी भांडते, त्याचे सामान/ कपडे तपासून पाहते, कधीकधी हे मारहाण आणि खून करण्याचे कारणदेखील ठरते. याच्या विरुद्ध म्हणजे एखाद्या व्यक्तीचे आपल्यावर जिवापाड प्रेम आहे, असाही भ्रम काहींना होतो. डॉक्टर, शिक्षक, सिनेमातील अभिनेते-अभिनेत्री अशा सार्वजनिक क्षेत्रातील व्यक्तींविषयी असे वाटते. त्या व्यक्तीचा पाठलाग करणे, पत्र पाठवणे, भेट देणे सुरू होते. त्या व्यक्तीजवळ इतर कुणी गेलेले सहन न होत नाही. काही व्यक्तींना आपल्या दिसण्यात किंवा शरीरात कमतरता वाटू लागते. अशा व्यक्ती काही विकृती नसताना भरमसाट पसा खर्च करून अवयव सुधारण्यामागे लागलेले असतात. त्यातील काही जणांना खात्री वाटते की, आपल्या शरीरात/त्वचेमध्ये किडा फिरत आहे, तो शोधून घालवण्यासाठी वेगवेगळे डॉक्टर-वैद्य केले जातात. काहींना इतर कुणी व्यक्ती किंवा संस्था मुद्दामहून त्रास देत आहे, असे वाटते. शेजारी, पोलीस, राजकारणी, पुढारी अशांवर संशय घेतले जातात. नेमके काय घडत असते? भ्रम आणि वास्तव यातील ओळखू न येणाऱ्या स्थितीला हायकॉसिस म्हणतात. त्यातील सर्वात गंभीर प्रकार म्हणजे स्किझोफ्रेनिया. इतर मानसिक आजारांतही असे काही प्रमाणात होऊ शकते. मेंदूचे काम बिघडून सारासार विचारांची जागा विकृत- विचित्र विचार आणि संवेदना घेत असल्याने असे घडते. मेंदूतील ‘डोपामिन’ नावाचे द्रव्य वाढल्याने असे होते हे सिद्ध केल्याबद्दल आर्वदि कार्लसनना २००० मध्ये नोबेल पुरस्कार मिळाला. त्यानंतर मेंदूत इतरही अनेक बदल होतात, असे आढळून आले आहे. उपचाराची पद्धती या प्रकारचे आजार आधुनिक पद्धतीचे औषध दिल्याशिवाय बरे होत नाही. ही औषधे अखेपर्यंत घ्यायला लागतात. भ्रम होत असलेल्या व्यक्तीमागे भूत, प्रेत, जादू असल्याचा समज असलने या व्यक्तींना अनेकदा मंदिर, दग्र्यात नेले जाते. मात्र त्यामुळे लवकर उपचार सुरू होत नाहीत. वेळेत उपचार झाले तर अशा व्यक्ती वास्तवाशी लवकर नाते जोडू शकतात. उपचार केलेली व्यक्ती शिक्षण, लग्न वगरे सर्व व्यवस्थित करू शकतात; पण उशीर झाला तर फक्त लक्षणे औषधांनी नाहीशी होतात. त्यानंतरही बुद्धी, उत्साह, व्यवहारज्ञान वापरण्याची क्षमता कमीच होते. इतर प्रकारचे भ्रम कमी करण्यासाठीही खूप मेहनत घ्यावी लागते. आधी तर व्यक्ती ‘हेच खरे आहे’ म्हणून ठामपणे अडून राहतात. त्यामुळे उपचारासाठी प्रवृत्त करणे जवळ जवळ अशक्य असते; पण आपल्या त्रासासाठी समुपदेशन करून घ्यायला ते तयार होतात. त्यातून त्यांना मदत करू शकतो. औषधांशिवाय भ्रम अजिबात जात नाहीत हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे. भ्रम ज्यांच्याविषयी असतात त्यांचे जीवन हे लोक अगदी नकोसे करून टाकतात, त्यामुळे कुटुंबीयांनी दुर्लक्ष करून नये. भ्रम इतके घट्ट असतात की, रुग्णांना कायदा किंवा समाजाची भीती वाटत नाही. त्यातून गुन्हे घडण्याची शक्यता असते. परदेशात अशा भ्रमाने त्रस्त झालेल्या व्यक्तींना शहर आणि नाव बदलून नवीन जीवन सुरू करण्यासाठी सरकार मदत करते. भ्रम आणि संशय हे गंभीर आजाराची लक्षणे असतात. ती लक्षात आल्यावर लगेच उपचार घ्यावेत. उशीर केल्यामुळे गुन्हा घडू शकतो आणि दिलेल्या औषधांचाही पूर्ण उपयोग होत नाही.