सूर्यकुमार यादवचं नाबाद अर्धशतक आणि गोलंदाजीत जसप्रीत बुमराहने केलेल्या धडाकेबाज कामगिरीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर ५ गडी राखून मात केली आहे. या विजयासह मुंबई इंडियन्सचं प्ले-ऑफमधलं स्थान जवळपास निश्चीत झाल्यात जमा आहे. १६५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सूर्यकुमारने एक बाजू लावून धरत मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. परंतू त्याआधी जसप्रीत बुमराहने मोक्याच्या षटकांमध्ये भेदक मारा करत RCB च्या धावगतीवर अंकुश लावला. १७ व्या षटकांत एकही धाव न देता बुमराहने RCB च्या दोन फलंदाजांना माघारी धाडलं.

अवश्य वाचा – IPL 2020 : जसप्रीत बुमराहचा ‘ड्रिम स्पेल’, लसिथ मलिंगाच्या कामगिरीशी केली बरोबरी

टी-२० क्रिकेटमध्ये १६ ते २० ही ४ षटकं फटकेबाजीची षटकं म्हणून ओळखली जातात. परंतू याच षटकांत निर्धाव षटक टाकून बुमराहने पुन्हा एकदा आपण टी-२० क्रिकेटमध्ये सर्वोत्तम का आहोत हे दाखवून दिलं. बुमराहच्या या कामगिरीवर भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवाग चांगलाच खुश झाला आहे. ‘विरु की बैठक’ या आपल्या कार्यक्रमात सेहवागने बुमराहचं कौतुक करताना त्याच्या कामगिरीची CBI चौकशी व्हायला हवी असं म्हटलंय. पाहा काय म्हणतोय सेहवाग…

फिलीप आणि पडीकल जोडीने चांगली सुरुवात केल्यानंतर चहरने RCB ला पहिला धक्का दिला. यानंतर बुमराहने RCB चा कर्णधार विराट कोहलीला स्वस्तात माघारी धाडत मुंबईला महत्वाचा बळी मिळवून दिला. यानंतर १७ व्या षटकात महत्वाचे दोन बळी घेत बुमराहने सामन्याचं पारडं पूर्णपणे मुंबईच्या दिशेने झुकवलं.

अवश्य वाचा – MI vs RCB : बुमराहची ‘विराट’ कामगिरी, आयपीएलमध्ये पूर्ण केलं बळींचं शतक