कोल्हापूर : सत्ता वंगाळ असते. माझे मंत्री पद गेले. तसे गाड्या, गाडीवालाही गेला आणि उरलो केवळ मी एकटाच! अशा शब्दांत माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सत्ता असताना आणि नसतानाचे विदारक चित्र मांडत मनीचे शल्य व्यक्त केले. हातकणंगलेतील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या एका प्रचार सभेमध्ये सदाभाऊ खोत यांनी सत्तासुंदरीचे कटू वास्तव मिश्किल पण तितक्याच मनाला भिडणाऱ्या रांगड्या शैलीत मांडले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खरं वजन कळलं

ते म्हणाले, सत्ता, मंत्री असताना काय रुबाब असायचा. कोणत्याही तालुक्यात गेलो की एक किलोमीटर लांबीची मोटारींची रांग लागलेली असायची. मला वाटायचं आपलं वजन चांगलंच वाढलं आहे ते किती वाढलंय हे मंत्रिपद गेल्यावर कळलं. मंत्री असताना रात्री एक वाजले तरी लोकांचे फोन यायचे, मी ते घ्यायचो. आता मी दिवसा फोन केला तरी उचलला जात नाही.

हेही वाचा : छत्रपती कुटुंबाने राजर्षी शाहू महाराजांच्या नावाला साजेसे काम केले नाही; मंडलिक घराण्याची पुन्हा एकदा टीका

गडी फिरकेना कि

आमचे सरकार गेले आणि दुसरे आले. तेव्हा मुंबईहून घरी परतलो. नेहमीप्रमाणे जनता दरबारासाठी खुर्चीवर बसलो घराकडे येणाऱ्या गाड्यांचा प्रकाशझोत दिसला कि वाटायचे गडी माझ्याकडे आला आहे. पण एकानेही गाडीची काच खाली केली नाही, असे वास्तव त्यांनी अधोरेखित केले.

आमदारांचे दुःख!

सत्ता आली की सगळेजण पळत येतात हेच खरे. हा संदर्भ सांगताना त्यांनी त्यामध्ये भाजपचे माजी आमदार प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनाही ओढून त्यांचेही दुःख कथन केले. ते म्हणाले, तर सुरेश हाळवणकर आमदार असताना त्यांच्याकडे मोठा दरबार भरलेला असायचा. त्यांना संपर्क केला की म्हणायचे, भाऊ कामाचा उरकच होत नाही. आता त्यांना विचारले की म्हणत असतात फेरफटका मारतोय. त्यांच्यासोबत हिंदुराव शेळके उरले आहेत.

हेही वाचा : कोल्हापूर जिल्हा परिषदेतील अपहारप्रकरणी अधिकाऱ्याचे अपहरण, मारहाण प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त

ओळखही दाखवत नाहीत

सत्ता असताना मी पोरांना, माझ्या पोरांना म्हणायचो, अरे! लोक रात्री – अपरात्री आपल्या घरी आलेत. त्यांना भेटा. त्यांच्या अडचणी समजून घ्या. इतकेच काय मी मंत्री असताना माझ्याकडे अनेक जण यायचे. त्यांना चांगले खाऊ घालायचो. त्याचा आस्वाद घेत ते म्हणायचे इतके मंत्री पाहिले पण भाऊ तुमच्यासारखा मंत्री पहिला नाही. तुमच्यासारखा माणूस नाही. आता मात्र यातील अनेक जण ओळख दाखवण्याचे टाळतात, अशा शब्दांत सदाभाऊ खोत यांनी आपले दुःख वेशीवर टांगले.

हेही वाचा : कोल्हापूरात पर्यावरण रक्षणासाठी सायकलवरून येऊन संदीप संकपाळ यांचा उमेदवारी अर्ज दाखल

बोलायचे तर दाबून

राजकारण करत असताना दाबून बोलावे लागते. कधी खरे. कधी खोटे, अशा शब्ता कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीचेच घ्या ना. मी सारखा म्हणत होतो हातकणंगले मधून मी लढणारच. लढणार नाही असे म्हणालो असतो तर लोक माझ्यासोबत राहिले असते का? ते म्हणाले असते, गडी मागे सरला. आता मी म्हणतो मंत्रीपद मिळणार आहे. ते विचारतात, खरेच का? मग मी त्यांना म्हणतो, लागा कामाला!

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In kolhapur sadabhau khot told what happens after losing power and ministership css