लंडन ऑलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व फेरीत धडक मारणाऱ्या पारुपल्ली कश्यपला आता वेध लागलेत ते नवी दिल्लीत होणाऱ्या इंडिया ओपन स्पर्धेच्या जेतेपदाचे. जेतेपदासाठीच्या दावेदारांमध्ये नाव असणे ही चांगली गोष्ट आहे. यामुळे प्रेरणा मिळते. चाहत्यांच्या अपेक्षांमुळे कधीही दडपण येत नाही, किंबहुना त्यांच्या प्रेमामुळे सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी प्रेरणा मिळते. जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानी असलेल्या कश्यपने जेतेपद पटकावण्याची उत्तम संधी असल्याचे सांगितले. स्पर्धेचे जेतेपद पटकावणारा पहिला भारतीय खेळाडू होण्यासाठी उत्सुक असल्याचेही त्याने पुढे सांगितले. कुठल्याही स्पर्धेत विजयाच्या उद्दिष्टानेच खेळतो. इंडिया ओपन स्पर्धा त्याला अपवाद नाही. मला अनेक मुद्दय़ांवर लक्ष द्यायचे आहे, मात्र माझे लक्ष्य जेतेपदच राहील हे कश्यपने स्पष्ट केले. जागतिक क्रमवारीत अव्वल दहामध्ये प्रवेश केल्याला फार दिवस झालेले नाहीत. माझ्यासाठी अचानकच गोष्टी बदलू लागल्या आहेत. सामान्य खेळाडूऐवजी महत्त्वाच्या स्पर्धामध्ये मी अव्वल मानांकित खेळाडू असतो. कोणीही स्वत:मध्ये सकारात्मक बदल घडवू शकतो. जगाने नोंद घ्यावी असे कर्तृत्व आपणही दाखवू शकतो. प्रत्येक सामना मी गांभीर्याने खेळतो आणि आत्मसंतुष्ट न होण्याचा प्रयत्न करतो, असे त्याने सांगितले.