पीटीआय, नसाऊ (बहामास) जागतिक ॲथलेटिक्स रिले स्पर्धेतून ऑलिम्पिक पात्रतेसाठी असलेल्या दुसऱ्या संधीचा अचूक फायदा घेत भारताच्या पुरुष आणि महिला संघांनी ४ बाय ४०० मीटर रिले शर्यतीत पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवली. यामुळे आता ऑलिम्पिकमधील ‘ट्रॅक अँड फिल्ड’ प्रकारांत (मैदानी खेळ) भारताच्या १९ खेळाडूंचा समावेश निश्चित झाला. ऑलिम्पिकमध्ये १ ऑगस्टपासून ॲथलेटिक्स प्रकारांना सुरुवात होईल. पात्रतेत रुपल चौधरी, एम. आर. पूवम्मा, ज्योतिका स्राी डांडी आणि सुभा वेंकटेश या महिला संघाने ३ मिनिटे २९.३५ सेकंद अशी वेळ देत दुसरा क्रमांक पटकावला. जमैकाने (३ मिनिटे २८.५४ सेकंद) पहिला क्रमांक मिळवला. त्यानंतर मोहम्मद अन्सारी, मोहम्मद अजमल, अरोकिया राजीव आणि अमोज जेकब यांच्या भारतीय पुरुष संघाने ३ मिनिटे ३.२३ सेकंद अशा वेळेसह पात्रतेत दुसरा क्रमांक मिळवला. अमेरिकेच्या संघाने अव्वल स्थान मिळवताना २ मिनिटे ६९.९५ सेकंद अशी वेळ दिली. पहिल्या संधीत भारतीय संघांच्या पदरी निराशा पडली होती. मात्र, ऑलिम्पिक पात्रतेसाठी जे अपात्र ठरले होते, त्यांना आणखी एक संधी देण्यात आली. पहिल्या फेरीत पुरुष संघ शर्यतही पूर्ण करू शकला नव्हता. हेही वाचा >>> IPL 2024: भले शाब्बास! हार्दिक पंड्याची पाठ थोपटत रोहित शर्माने केलं कौतुक, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय घडलं? भारतीय पुरुष आणि महिला संघ त्यांच्या वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीपेक्षा खूप दूर राहिले, पण ऑलिम्पिक पात्रतेसाठी ठरवून दिलेल्या निकषापेक्षा त्यांची कामगिरी निश्चित उजवी ठरली. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्यांनी ही संधी साधताना अमेरिकेसारख्या अव्वल संघाचा पाठलाग केला. भारताला मिश्र रिले शर्यतीतून मात्र माघार घ्यावी लागली. पहिल्या संधीत पुरुष संघाला शर्यत पूर्ण करता आली नाही. पायात गोळा आल्यामुळे राजेश रमेशने शर्यत अर्धवट सोडली होती. दुसऱ्या संधीला रमेशच्या जागी अरोकिया राजीवला संधी देण्यात आली. पुरुष संघासाठी पर्याय उपलब्ध होता, पण मिश्र रिले शर्यतीसाठी दुसऱ्या नावाचा विचार करण्यात आला नाही. त्यामुळे भारताला या शर्यतीतून माघार घेत पॅरिस ऑलिम्पिकच्या पात्रतेच्या संधीवर पाणी सोडावे लागले. महिलांकडून आश्चर्याचा सुखद धक्का भारतीय ॲथलेटिक्स संघटनेने आपले पूर्ण लक्ष पुरुष रिले संघाच्या कामगिरीकडे केंद्रित केले होते. पुरुष संघ पात्रता सिद्ध करणार याची त्यांना खात्री होती. यामुळे महिला संघाने मिळवलेली पात्रता ही भारतासाठी एक आश्चर्याचा सुखद धक्काच ठरली. पुरुष संघाची यापूर्वी कामगिरी अधिक सरस होती. त्यांनी गेल्या वर्षी सलग दोन स्पर्धांमध्ये वेळेचा आशियाई विक्रम मोडीत काढला होता. त्यामुळे त्यांच्याकडून पुन्हा दर्जेदार कामगिरीची अपेक्षा केली जात होती. रुपल, पूवम्मा, ज्योतिका आणि सुभा यांच्या महिला संघाकडे फारसे कुणी लक्ष देत नव्हते. मात्र, महिला संघाने रिले शर्यतीसाठी आठव्यांदा ऑलिम्पिक पात्रता सिद्ध केली. भारतीय महिला रिले संघ सर्वप्रथम १९८४ मध्ये ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला होता.