गेल्या काही दिवसांपासून कोलकाता शहराला मुसळधार पावसाने झोडपून काढलं होतं. त्यात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातला दुसरा सामना कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर खेळवला जाणार होता. क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालच्या प्रयत्नांमुळे हा सामना वेळेत सुरु झाला खरा, मात्र पाहुणा कांगारु संघ आयोजकांनी पुरवलेल्या जेवणावर नाराज असल्याचं कळतंय. ‘क्रिकेटनेक्सट’ या वेवसाईटने यासंदर्भातलं वृत्त प्रसारित केलं आहे.

आयोजकांकडून ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना जेवणात पुरवण्यात आलेलं चिकन हे व्यवस्थित शिजवलं गेलं नसल्याची तक्रार खेळाडूंनी केल्याचं समजतंय. ऑस्ट्रेलियाच्या संघ व्यवस्थापनाने, खेळाडूंच्या डाएट प्लाननुसार जेवणाच्या पद्धती आयोजकांना कळवल्या होत्या. मात्र क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल यांच्याकडून जेवणात पुरवण्यात आलेलं चिकन योग्य रितीने शिजवलं गेलं नसल्याची तक्रार ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी केली.

प्रत्येक सामन्याआधी यजमान शहरातील क्रिकेट बोर्डाला खेळाडूंच्या प्रवासाचे तपशील आणि जेवण्याच्या पद्धती याची माहिती दिली जाते. याचप्रमाणे १२ सप्टेंबरला क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालला दोन्ही संघाच्या प्रवासाचे तपशील देण्यात आले होते.

ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी केलेल्या तक्रारीनंतर संबंधीत अधिकाऱ्यांनी तात्काळ पावलं उचलत कारवाई केलेली आहे. दोन्ही संघांच जेवणं बनवणाऱ्या ‘शेफ’ना अशी चुक पुन्हा होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश दिलेत. पावसामुळे इडन गार्ड्नसवर दोन्ही संघांना सराव करता आला नाही. मैदानात पावसाचं पाणी साठल्यामुळे दोन्ही संघानी हॉटेलवर राहणं पसंत केलं होतं.