२०१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघासमोर गुरुवारी वेस्ट इंडिजचं आव्हान असणार आहे. पहिल्या ३ सामन्यांमध्ये विजय मिळवल्यानंतरही भारतीय संघात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी कोण येणार हे गणित सुटलं नाहीये. अफगाणिस्तानविरुद्ध सामन्यात महेंद्रसिंह धोनीने केलेल्या संथ खेळीमुळे, संघ व्यवस्थापन वेस्ट इंडिजविरुद्ध सामन्यात धोनीची जागा बदलण्याच्या तयारीत आहेत. अशा परिस्थितीमध्ये केदार जाधव हा चौथ्या क्रमांकासाठी योग्य पर्याय असल्याचं, भारताचे माजी प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांनी म्हटलं आहे.

“केदार जाधव हा हुशार खेळाडू आहे, याचसोबत तो चांगलं स्ट्राईक रोटेट करतो. खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर तो चांगले फटके खेळू शकतो, त्यामुळे माझ्यामते केदार जाधव चौथ्या क्रमांकासाठी योग्य पर्याय आहे.” गायकवाड IANS वृत्तसंस्थेशी बोलत होते. याव्यतिरीक्त गायकवाड यांनी दिनेश कार्तिकच्या नावालाही चौथ्या क्रमांकाच्या जागेवरची पसंती दिली आहे. कोहलीसोबत स्ट्राईक रोटेट करणारा खेळाडू चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येणं गरजेचं आहे. हे दोन्ही खेळाडू चौथ्या क्रमांकाच्या जागेवर खेळू शकतात, असं गायकवाड म्हणाले.

शिखर धवनला दुखापतीमुळे संघातून माघार घ्यावी लागल्यानंतर ऋषभ पंतला भारतीय संघात जागा देण्यात आली. मात्र गायकवाड यांच्या मते ऋषभ पंत चौथ्या क्रमांकासाठी योग्य पर्याय नाहीये. “पंत चौथ्या क्रमांकासाठी योग्य पर्याय नाही. तो चांगले फटके खेळतो, पण चौथ्या क्रमांकावर खेळणाऱ्या फलंदाजाला खेळपट्टीवर टिकून रहावं लागतं. पंत या बाबतीमध्ये अजुन परिपूर्ण नाही.” गायकवाड यांनी आपलं मत मांडलं.

अवश्य वाचा – World Cup 2019 : या धोनीचं करायचं काय? टीम इंडियाच्या मॅनेजमेंटसमोर गहन प्रश्न